लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:25 IST2026-01-24T14:24:40+5:302026-01-24T14:25:41+5:30
शेळके यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात वायनाडच्या भूस्खलनात शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी बचाव मोहिमेचे नेतृत्व केले होते

लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांची सुखरूप सुटका केल्याबद्दल महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या कन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना भारत सरकारचा मानाचा ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.
नैसर्गिक संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सरकारने शुक्रवारी ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६’ची घोषणा केली. देशभरातून आलेल्या २७१ नामांकनांतून शेळके यांची वैयक्तिक श्रेणीत निवड झाली आहे.
लेफ्टनंट कर्नल सीता शेळके मूळ अहिल्यानगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या रहिवासी आहेत. सीता यांनी आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण अहिल्यानगरमधूनच पूर्ण केले. २०१२ मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्या भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
वायनाडमधील साहस
२०२४ मध्ये केरळच्या वायनाडमध्ये भीषण भूस्खलनाची घटना घडली होती. लेफ्ट.कर्नल सीता शेळके यांना बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले होते. शेळके यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी बचाव मोहिमेचे नेतृत्व केले.
चूरलमाला येथे १९० फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत उभारणी करण्याचे श्रेय शेळके यांना जाते. पूल तुटल्यामुळे दुर्गम भागातील गावांशी संपर्क तुटला होता. या पुलामुळे संपर्क करणे सोपे झाले. एवढेच नव्हे तर, कोमात्सु पीसी २१० एक्सकॅव्हेटरचा कल्पक वापर करून त्यांनी अवघ्या चार तासांत तात्पुरता पादचारी पूल तयार केला होता.