केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 05:33 IST2026-04-05T05:32:17+5:302026-04-05T05:33:15+5:30
वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याचा प्रचारकांना दिला सल्ला

केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
तिरुवल्ला (केरळ) : केरळमध्ये यंदा सत्ताबदल निश्चित आहे. सत्ताधारी डाव्या आघाडीचे (एनडीएफ) सरकार पायउतार होऊन भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत येईल, असा विश्वास पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी पथनमथिट्टा जिल्ह्यात तिरुवल्लामधील सभेत व्यक्त केला.
या सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती एनडीएबाबत येथील लोकांना वाटणाऱ्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे मोदी म्हणाले. विशेषत: माता-भगिनींचा पाठिंबा या स्नेहाचे व विश्वासाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. केरळमधील निवडणूक जवळून पाहण्याचा पूर्वी अनेकदा योग आल्याचे सांगून यंदा राजकीय वातावरण वेगळे दिसत असल्याचा दावा मोदी यांनी केला.
केरळच्या विकासाचेच लक्ष्य
राज्यात भाजप सत्तेत आला, तर केरळचा विकास हेच लक्ष्य असेल, असे सांगून गोवा तसेच ईशान्येतील ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या अधिक असलेल्या सहा राज्यांत, असा विकास झाल्याचा दावा मोदी यांनी केला. हे राज्य विकासाच्या शर्यतीत इतर राज्यांच्या तुलनेत मागे असल्याचे ते म्हणाले.
‘वादग्रस्त वक्तव्ये टाळा’
काँग्रेस व विरोधी पक्षांनी आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त वक्तव्ये करणे टाळावे, असा इशारा मोदी यांनी दिला. या वक्तव्यांमुळे या देशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो. निवडणुका येत-जात राहतील. परंतु, आखातातील केरळमधील बांधवांच्या सुरक्षिततेलाच प्राधान्य राहील, असे मोदी म्हणाले.
केरळ विधानसभेचे चित्र
- १४० जागा
- एकूण उमेदवार ४२०
- पुरुष उमेदवार ३७४
- महिला उमेदवार ४६
- यात यूडीएफने १२, डाव्या आघाडीने १८ तर एनडीएने १६ महिलांना उमेदवारी दिली आहे.