नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा एक तरुण भरकटत दहशतवादाच्या मार्गावर चालत होता. त्याच्या वडिलांनी मनपरिवर्तन करून त्याला भारतीय सैन्यदलात भरती केले. या तरुणाने शोपियानेमध्ये दहशतवाद्यांशी लढताना प्राणांची बाजी लावली व धारातिर्थी पडला. अशा या भारतमातेच्या सुपुत्राला येत्या प्रजासत्ताक दिनी मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. ही बातमी अशावेळी आली आहे, जेव्हा बारामुला जिल्हा दहशतवाद मुक्त घोषित करण्यात आला आहे.
लान्स नायक नाझीर अहमद वानी असे या शहीद सुपुत्राचे नाव आहे. नाझीर हे एके काळी दहशतवादी होते. त्यांच्यासारख्यांना काश्मीरमध्ये 'इख्वान' असे म्हटले जाते. हातात बंदूक घेऊन ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी रोज निघत असत. परंतू काही काळाने त्यांना आपण चुकत असल्याचा साक्षात्कार झाला आणि वडिलांच्या मदतीने त्यांनी दहशतवाद सोडून सैन्यात भरती झाले.
लान्स नायक पदावर भारतमातेची त्यांनी सेवा केली. 23 नोव्हेंबर 2018 रोजी वानी 34 राष्ट्रीय रायफल्सच्या सहकाऱ्यांसोबत सेवा बजावत होते. यावेळू शोपियान जिल्ह्यातील बटागुंड गावात हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाचे 6 दहशतवादी लपल्याची खबर जवानांना लागली. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे होती. वानी आणि त्यांच्या टीमवर दहशतवाद्यांचे पलायन रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
ही जबाबदारी पार पाडत असताना वानी यांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आणि सहकाऱ्याला वाचविताना धारातिर्थी पडले. दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरु केला आणि ग्रेनेडही फेकले. या दहशतवाद्याला रोखण्यासाठी वानी यांनी प्राणांची बाजी लावत जवळ जात त्याला यमसदनी धाडले. मात्र, यावेळी गोळी लागल्याने ते शहीद झाले. या चकमकीत त्यांच्या पथकाने सहाही दहशतवाद्यांना ठार केले होते.