अग्निकल्लोळ! कोलकात्याच्या नाजिराबादमध्ये भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, २० जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 19:08 IST2026-01-26T19:07:50+5:302026-01-26T19:08:43+5:30
कोलकात्याच्या नाजिराबाद भागातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अग्निकल्लोळ! कोलकात्याच्या नाजिराबादमध्ये भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, २० जण बेपत्ता
कोलकात्याच्या नाजिराबाद भागातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गोदामाच्या आतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यापासून २० जण बेपत्ता आहेत. ड्राय फूड गोदामाला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीवर अंशतः नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान गॅस कटर घेऊन इमारतीत शिरले. आनंदपूरच्या नाजिराबादमधील या गोदामात प्रामुख्याने सुका मेवा, पाकीटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या बाटल्या साठवल्या होत्या. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग शेजारील दोन गोदामांमध्ये पसरली असून त्यातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.
गोदाम एका अरुंद गल्लीत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना तेथे पोहोचण्यास आणि आग विझवण्यास मोठी कसरत करावी लागली. लांब पाईपशिवाय पाणीपुरवठा करणं कठीण जात असल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास उशीर झाला. काही ठिकाणी अजूनही आग धगधगत असून ती पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बंगालचे मंत्री राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. मंत्री म्हणाले, "पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. आग बऱ्याच अंशी नियंत्रणात आली असून जवान इमारतीत शिरले आहेत. आत आणखी कोणी अडकले आहे का, हे नंतर स्पष्ट होईल. ही वेळ राजकारण करण्याची नसून, अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू देण्याची आहे."
गोदामाला आग नेमकी कशी लागली, याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रात्रीच्या ड्युटीवर असलेले कर्मचारी आत अडकले होते. तसेच सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सहा जणही यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांनी असा आरोप केला आहे की, गोदाम बाहेरून बंद होतं, ज्यामुळे आत असलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही.