“प्रियंका गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद दिले असते तर काँग्रेस…”; किरेन रिजिजू यांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:59 IST2026-03-10T16:56:08+5:302026-03-10T16:59:32+5:30
Kiren Rijiju In Parliament: विरोधी पक्षनेते भाषण करतात आणि निघून जातात. बोलायची संधी दिली जात नाही, असा आरोप करतात. पण संसद सुरू झाली की परदेशात निघून जातात, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

“प्रियंका गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद दिले असते तर काँग्रेस…”; किरेन रिजिजू यांची टोलेबाजी
Kiren Rijiju In Parliament: काँग्रेसने देशाच्या घटनात्मक संस्थांवर मोठी टीका केली आहे. २०१४ नंतर या घटनात्मक संस्थांवर टीका करण्याच्या सुरू झालेल्या मालिकेत लोकसभा अध्यक्षांचे स्थान कसे सुटले, याचा मला प्रश्न पडला होता. आता हे स्पष्ट झाले आहे की, जर तुम्हाला भारतीय लोकशाहीवर टीका करायची असेल तर लोकसभा अध्यक्षांवर निशाणा साधा. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. या निर्णयाबाबत तुम्ही असहमत असू शकता. आम्हालाही पटतेच असे नाही, पण आम्ही कोणाचे शत्रू नाही, या शब्दांत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावेळी किरेन रिजिजू बोलत होते. विरोधी पक्षनेते भाषण देत असतानाच लोकसभा अध्यक्षांनी एक आदेश जारी केला. लोकसभा अध्यक्षांनी आदेश जारी केल्यानंतरही बोलू दिले जात नसल्याचे ते सांगत होते. लोकसभा अध्यक्षांचा आदेश अंतिम असतो. तरीही, हे काँग्रेस सदस्य वारंवार उभे राहिले. विरोधी पक्षनेत्यांनी बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते १५ व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी फक्त दोनदाच भाषण दिले. ते अधिवेशन सुरू असतानाच परदेशात जातात, असा टोला रिजिजू यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते केवळ आपले भाषण देतात आणि निघून जातात
नियमांनुसार जेव्हा एखादा सदस्य बोलायला उभा राहतो, तेव्हा त्याला पुढच्या वक्त्याने ऐकायचे असते. परंतु, विरोधी पक्षनेते केवळ आपले भाषण देतात आणि निघून जातात. कोणाचेही ऐकत नाही. पंतप्रधान इथे बसले आहेत आणि ते मिठी मारण्यासाठी धावत येतात. त्यांच्या खासदारांना डोळे मिचकावतो. असा विरोधी पक्षनेता आपण पहिल्यांदाच पाहिला आहे. जसा विरोधी पक्षनेता तसाच त्यांचा पक्षही आहे. पण हे काही बरोबर नाही, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षातही चांगले लोक आहेत; परंतु, त्यांना विरोधी पक्षनेते बनवण्यात आले, मी याबद्दल काय करू शकतो? प्रियंका गांधी मागून हसत बसल्या होत्या. जर त्यांना विरोधी पक्षनेते बनवले असते तर त्यांची कामगिरी चांगली झाली असती. किमान त्या ऐकून घेतात. कोणी चांगले काम करत असेल तर त्यांचे कौतुक करणे ही माझी जबाबदारी आहे, असेही रिजिजू यांनी सांगितले.