लोकसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, पंतप्रधान मोदींनाही दिल्या धमक्या, भाजपचा विरोधकांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:12 IST2026-02-12T13:11:04+5:302026-02-12T13:12:53+5:30
Kiren Rijiju: संसदेच्या आवारातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडिओ जारी करत काँग्रेस खासदारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, पंतप्रधान मोदींनाही दिल्या धमक्या, भाजपचा विरोधकांवर आरोप
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता थेट लोकसभा अध्यक्षांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेसच्या २० ते २५ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात बेकायदेशीरपणे प्रवेश करून अपशब्द उच्चारले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावले, असा खळबळजनक आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील रिजिजू यांनी शेअर केला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या दालनात बेकायदेशीरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. रिजिजू म्हणाले की, "सुमारे २० ते २५ खासदार अध्यक्षांच्या दालनात घुसले आणि त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले. यावेळी तिथे प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. मात्र, त्यांनी खासदारांना रोखण्याऐवजी त्यांना भांडण्यासाठी उद्युक्त केले."
"सभापतींचे दालन हे सभागृहाचा भाग मानले जाते, जिथे व्हिडिओ शूटिंग करणे नियमांच्या विरोधात आहे. दालनात उपस्थित खासदारांनी केवळ अध्यक्षांचा अपमान केला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धमकावले. अध्यक्ष ओम बिर्ला हे अतिशय साधे व्यक्ती आहेत, अन्यथा त्यांनी यापूर्वीच कठोर कारवाई केली असती," असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. संसदेच्या नियमावलीनुसार, अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारचे रेकॉर्डिंग करण्यास बंदी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शूट करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणावर बोलताना रिजिजू यांनी सांगितले की, भाजप हा नेहमीच सभागृहात चर्चा आणि वादविवादावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, परंतु खासदारांनी अशा प्रकारे शारीरिक किंवा शाब्दिक धमक्या देणे, हे लोकशाहीला शोभा देणारे नाही. दुसरीकडे, काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळले असून सत्ताधारी पक्ष केवळ मुख्य मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी असे आरोप करत असल्याचा दावा केला आहे.