६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 14:39 IST2024-11-27T14:38:40+5:302024-11-27T14:39:25+5:30
उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात सैफई मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत डॉक्टरसह ५ जणांचा मृत्यू झाला.

६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात सैफई मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत डॉक्टरसह ५ जणांचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत व्यक्ती राज्यातील विविध जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातात मृत्यू झालेला संतोष कुमार हा सैफई मेडिकल कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन होता. तर राकेश कुमार हा स्टोअर कीपर होता. इतर सर्व मृतक एमबीबीएसचं शिक्षण घेऊन एमडीचं शिक्षण घेत होते. या अपघातात कनौज येथील तेरामल्लू येथील रहिवासी असलेले ३४ वर्षीय अरुण सैफई मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर म्हणूनही कार्यरत होते आणि पुढे एमडीचं शिक्षण घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणचे वडील शेतकरी आहेत. अरुणला एकूण चार भाऊ आणि सहा बहिणीही आहेत. अरुणचं अजून लग्न झालं नव्हतं. अरुणचा भाऊ कानपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. बहिणीही वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच अरुणच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
कानपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेला लहान भाऊ पवन कुमार म्हणाला की, आमच्या सर्व भावांच्या शिक्षणाची तसेच आमच्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारी अरुणवर होती. जेव्हा आम्ही त्याच्याशी लग्नाबद्दल बोलायचो तेव्हा तो म्हणायचा की मी एमडीचे शिक्षण पूर्ण करेन आणि मग लग्न करेन. रात्री अरुणशी बोलल्याचं पवनने सांगितलं. अरुणने सांगितलं की, तो मित्रांसोबत लखनौमध्ये एका लग्नाला आला होता.
पवनने सांगितलं की, अरुणला लग्नासाठी लखनौला जावसं वाटत नव्हतं, पण त्याचे मेडिकल कॉलेजचे मित्र लग्नाला जात होते, त्यांनी लग्नाला जाण्याचा आग्रह धरला. बळजबरीने अरुणने होकार दिला. आम्ही फोनवर बोललो तेव्हा अरुण लग्न समारंभाला उपस्थित होता आणि मित्रांच्या सांगण्यावरून लग्न समारंभाला आलो आहे आणि रात्रीच परत येईल असं सांगत होता.
भावांच्या शिक्षणासोबतच अरुणने ६ बहिणींच्या लग्नाची जबाबदारी अरुणने घेतली होती. एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर तो सैफई मेडिकल कॉलेजमध्येच डॉक्टर होता. तिथून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो आमच्या शिक्षणाचा खर्च उचलत असे. लग्नाबाबत बोलताना तो म्हणायचा की, आधी तो आपल्या बहिणींच लग्न लावेल आणि मग स्वतःचं आयुष्य सांभाळेल.