चेन्नई - तामिळनाडू विधानसभेच्या निकालात सत्ताधारी डिएमकेची सत्ता उलथावून लावण्यात अभिनेता थलापती विजय यांना यश आले आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने राज्यात सर्वाधिक १०८ जागा जिंकल्या. त्यानंतर काँग्रेससह इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर टीव्हीके आज राज्यात सरकार बनवणार आहे. चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर विजय मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत इतरही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यात अवघ्या २९ वर्षीय किर्तना मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. ती टीव्हीके पक्षाकडून शिवकाशी मतदारसंघातून आमदार बनली आहे.
एस. किर्तना तिच्या हिंदीमुळे सर्वात चर्चेत आली. मी यासाठी हिंदीत बोलते, जेणेकरून आमचे नेते विजय यांच्याबाबत सर्वांना माहिती असायला हवे असं त्यांनी सांगितले. मागील वर्षी तामिळनाडूत हिंदी सक्तीविरोधात आंदोलन झाले होते, त्यात एस किर्तना यांनी हिंदीचा प्रखर विरोध केला होता. फटाके उत्पादन कारखान्यांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या शिवकाशी मतदारसंघातून किर्तना यांनी निवडणूक जिंकली आहे. माझ्या पक्षाची भूमिका सर्वांना कळावी. माझे नेते विजय यांचे विचार समजावे यासाठी मी हिंदीत बोलते. राजकारण अशी गोष्ट आहे ज्यात तुम्हाला भीती नसली पाहिजे. सर्वांनी राजकारणात आले पाहिजे असंही किर्तना यांनी त्यांच्या विजयानंतर आवाहन केले होते.
कोण आहे एस. किर्तना?
एस किर्तना हिचं संपूर्ण नाव किर्तना संपत असं आहे. ती अवघ्या २९ वर्षाची आहे. तिला अनेक भाषा येतात. थलापती विजय यांची ती समर्थक आहे. एस.किर्तना आधी राजकीय सल्लागार म्हणून काम करत होती. किर्तना यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिने आधी एम.के स्टॅलिन यांच्यासह राज्यातील बड्या राजकीय नेत्यांसोबत काम केले आहे. टीव्हीके पक्षाकडून किर्तना यांनी शिवकाशी मतदारसंघात निवडणूक लढवली. याठिकाणी मोठा विजय मिळवून त्यांनी इतिहास रचला. ती शिवकाशी मतदारसंघातील पहिली महिला आमदार बनली. मागील ७० वर्षाच्या काळात या मतदारसंघात कायम पुरुषाचे वर्चस्व राहिले होते. तामिळ भाषेवर प्रचंड प्रेम असणारी किर्तना हिने शालेय शिक्षण सरकारी शाळेतून घेतले आहे. परंतु तिला इतर भाषेचेही चांगले ज्ञान आहे.
थलापती विजय यांनी ९ मे रोजी राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमताच्या आकड्यासह त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल यांनी विजय यांना सरकार बनवण्याचं निमंत्रण देत मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. राज्यपालांनी विजय यांना १३ मे २०२६ किंवा त्याआधी विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवण्याची सूचना केली आहे. सिनेमातून राजकारणात एन्ट्री घेतलेल्या विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत ब्लॉकबस्टर एन्ट्री घेत अनेक दिग्गजांना मोठा धक्का दिला. तामिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकून विजय यांच्या पक्षाने प्रस्थापित पक्षांना सत्तेतून बाहेर काढले.