चोरी करायला आलेला चोर पोलीस स्टेशनला गेला अन् गावकऱ्यांविरोधातच दाखल केली एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:20 IST2025-06-08T18:19:15+5:302025-06-08T18:20:37+5:30
Jharkhand: या अजब घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

चोरी करायला आलेला चोर पोलीस स्टेशनला गेला अन् गावकऱ्यांविरोधातच दाखल केली एफआयआर
Jharkhand News: झारखंडची राजधानी रांचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे 'चोर तो चोर, वर शिरजोर' ही म्हण खरी ठरली. चोरी करण्यासाठी आलेल्या एका टोळीतील चोराने स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि चक्क गावकऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही, तर सोशल मीडिया आणि संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
झाले असे की, ४ जूनच्या रात्री १ वाजता पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील रहिवासी विजय कुमार आपल्या पाच साथीदारांसह रांचीच्या सत्यारी परिसरात चोरी करण्यासाठी आला होता. चोरांनी एका घरात घुसून कपाटातून सोन्याची साखळी आणि रोख रक्कम चोरली. पण त्यानंतर घरमालक जागा झाला आणि आरडाओरडा करू लागला. यानंतर, चोरांनी तोंड दाबून त्याला विहिरीत फेकण्याचाही प्रयत्न केला. पण, आवाज ऐकून गावकरी जागे झाले आणि घटनास्थळी पोहोचले.
अंधाराचा फायदा घेत दोन चोर पळून गेले, तर विजयसह इतर चार जणांना पकडण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत विजयचा हात तुटला, त्याच्या साथीदारांनाही गंभीर दुखापत झाली. यानंतर विजय कुमार स्वतः जगन्नाथपूर पोलिस स्टेशनला पोहोचला आणि गावकऱ्यांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली.
विजयने आपल्या जबाबात म्हटले की, गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे होते, परंतु त्यांनी बेदम मारहाण केली. चोराच्या तक्रारीवरुन स्टेशन प्रभारी दिग्विजय सिंह यांनी अज्ञात ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.