Jharkhand News:झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात दुसऱ्या महायुद्धातील 227 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे. 17 मार्च रोजी सापडलेला या बॉम्बला निष्क्रिय करण्यात अद्याप यश आले नाही. आता भारतीय सैन्याची विशेष बॉम्ब निकामी पथक ‘बंकर तंत्र’ (Bunker Technique) वापरून बॉम्बला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहे.
9 दिवसांपासून ऑपरेशन सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील पानीपडा-नागुड़साई परिसरात सुवर्णरेखा नदीच्या किनाऱ्यावर खोदकामादरम्यान हा 500 पाउंड (227 किलो) वजनाचा बॉम्ब आढळला होता. प्राथमिक तपासात हा बॉम्ब पूर्णपणे जिवंत अवस्थेत असल्याचे आढळून आले, त्यामुळे तो निष्क्रिय करणे अत्यंत धोकादायक मानले जात आहे. भारतीय सैन्याच्या तज्ज्ञ टीमने बॉम्बची वैज्ञानिक तपासणी केली असून, बंकर तंत्राने बॉम्ब निकामी केला जाणार आहे.
काय असते ‘बंकर तंत्र’?
या अत्यंत शक्तिशाली बॉम्बला निष्क्रिय करताना होणारे कंपन, स्फोटाचा दाब आणि उडणारा ढिगारा नियंत्रित करण्यासाठी सैन्य ‘बंकर तंत्र’ वापरणार आहे. या तंत्रामध्ये बॉम्बच्या चारही बाजूंनी वाळूने भरलेल्या पोत्यांची उंच भिंत तयार केली जाते आणि जमिनीमध्ये विशेष खड्डा तयार केला जातो. याद्वारे स्फोटाचा दाब जमिनीत शोषला जाईल अशी व्यवस्था केली जाते. यामुळे स्फोट परिणाम कमी होतो.
1 किलोमीटर परिसर रिकामा
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने स्फोटक सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 1 किलोमीटर परिसरातील लोकांना तात्पुरते स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः पानीपडा गावातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण परिसर सैन्याने ताब्यात घेतला आहे. अधिकृत व्यक्तींनाच या भागात प्रवेश दिला जातोय. ऑपरेशनदरम्यान त्या परिसरात हेलिकॉप्टर किंवा विमान उड्डाणावरही बंदी घालण्यात आली आहे.
बॉम्ब इथे कसा आला?
हा दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन बॉम्ब असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्या काळात विमानातून हा या परिसरात टाकण्यात किंवा चुकून पडला असावा, अशी शक्यता आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही हा बॉम्ब जिवंत अवस्थेत आहे. महत्वाचे म्हणजे, ड्रोन सर्वेक्षणादरम्यान त्या परिसरात आणखी एक बॉम्ब असण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या ड्रोन सर्वे आणि मेटल डिटेक्टरद्वारे याचा शोध घेतला जातोय.
Web Summary : A WWII bomb found in Jharkhand remains active. Disposal failed after nine days. The army will now use the 'Bunker Technique' involving sandbag walls and underground absorption to safely neutralize it. A 1km evacuation zone is in effect while the operation continues.
Web Summary : झारखंड में मिला द्वितीय विश्व युद्ध का बम अभी भी सक्रिय है। नौ दिनों बाद भी निष्क्रिय करने में विफलता। सेना अब रेत की बोरियों की दीवारों और भूमिगत अवशोषण से युक्त 'बंकर तकनीक' का उपयोग करके इसे सुरक्षित रूप से निष्क्रिय करेगी। ऑपरेशन जारी रहने के दौरान 1 किमी का निकासी क्षेत्र प्रभावी है।