आखाती देशांतील युद्धामुळे जगावर तेल संकट; रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीसाठी सरसावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 08:08 IST2026-03-04T08:08:06+5:302026-03-04T08:08:52+5:30
अमेरिका, इस्रायल यांनी इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केल्यानंतर इराणनेही पलटवार करत आखाती देशांना टार्गेट केले. त्याशिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही धमकी दिली आहे.

आखाती देशांतील युद्धामुळे जगावर तेल संकट; रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीसाठी सरसावला
नवी दिल्ली - अमेरिका-इस्रायलच्याइराणवरील हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणने प्रत्युत्तर देत संपूर्ण पश्चिम आशियाई देशांना युद्धात ओढले आहे. इराणने इस्रायलसह सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, जॉर्डन, यूएई या देशातील अमेरिकन सैन्य तळ आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना टार्गेट केले आहे. इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगावर तेल संकट उभे राहिले आहे. त्यातच भारताकडे ५० दिवस पुरेल इतका क्रूड ऑईल आणि रिफाइंड ऑईलचा साठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
माहितीनुसार, जर आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा खंडीत झाला तर आम्ही भारताला ऊर्जा प्रकल्पात मदत करण्यासाठी तयार आहोत असं रशियाने स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियात वाढत्या तणावामुळे ऊर्जा मार्केट अस्थिर झाले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या माध्यमातून होणारा तेल पुरवठ्याबाबत गंभीर चिंता वाढली आहे. हा एक सागरी मार्ग आहे जो जागतिक तेल आणि गॅस व्यापारात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारताकडे पर्याप्त कच्चे तेल आणि इंधनाचा साठा आहे. त्यामुळे काही दिवस आपण या संघर्षातून उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करू शकतो असं भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतात जवळपास निम्मे कच्चे तेल आणि एलपीजीचे आयात स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून होते. परंतु अमेरिका, इस्रायल यांनी इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केल्यानंतर इराणनेही पलटवार करत आखाती देशांना टार्गेट केले. त्याशिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही धमकी दिली आहे. त्यामुळे सध्या या मार्गावरून सागरी वाहतूक ठप्प झाली आहे. भारताकडे आताच्या घडीला कच्चे तेल आणि रिफाइंड पेट्रोलियन उत्पादनाचा एकूण ५० दिवसांचा साठा शिल्लक आहे, ज्यात २५ दिवसाचे कच्चे तेल आणि २५ दिवसांचे पेट्रोलियम उत्पादनाचा समावेश आहे. पश्चिम आशियात वाढणाऱ्या तणावात केंद्रीय अधिकारी कच्चे तेल, एलपीजी, एलएनजी आयात करण्यासाठी पर्यायी देशांचाही शोध घेत आहेत.
दरम्यान, भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि अन्य इंधनाची मागणई करण्यासाठी सहा ते आठ आठवड्यापर्यंत पर्याप्त कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादन साठा आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे होणाऱ्या कोणत्याही अल्पकालीन पुरवठ्यातील संकटाला तोंड देण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस पुरवठा मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले आहे. कच्चे तेल आयात करणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. त्याशिवाय तेल शुद्धिकरण क्षमतेत चौथ्या क्रमांकावर आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत पाचव्या क्रमांकावर आहे.