Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:52 IST2025-06-21T09:50:58+5:302025-06-21T09:52:33+5:30
Israel-Iran War: मशहद शहरातून सुमारे एक हजार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे हवाई क्षेत्र खुले केले आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत मायदेशी परतणाऱ्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे.

Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
Israel-Iran War: मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी हल्ले वाढवले आहेत. अनेक भारतीय नागरिक शिक्षणासाठी आणि कामासाठी इराणमध्ये आहेत. दरम्यान, आता या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज मशहद शहरातून सुमारे एक हजार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी इराणने हवाई क्षेत्र खुले केले आहे.
या भारतीय नागरिकांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इराणी दूतावासाचे उपप्रमुख मोहम्मद जावेद हुसैनी म्हणाले की, 'गरज पडल्यास येत्या काळात भारतीयांना इराणमधून परत आणण्यासाठी अधिक उड्डाणे चालवता येतील.
भारताने ऑपरेशन सिद्धू सुरू केले
इस्रायली हल्ल्यांनंतर भारतीय नागरिकांना तेहरानहून मशहदला हलवण्यात आले. इराणी एअरलाइन महान द्वारे चालवल्या जाणाऱ्या सुटकेच्या विमानांची व्यवस्था नवी दिल्ली करत आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, भारताने बुधवारी या दोन्ही देशांतील नागरिकांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले.
हुसैनी म्हणाले की, आम्ही भारतीयांना आपले मानतो. ते इराणी लोकांसारखे आहेत. इराणचे हवाई क्षेत्र बंद आहे, पण या समस्येमुळे, आम्ही भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्र सुरु करत आहोत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरान यांच्यात संपर्क
भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी इराण भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्कात आहेत. इराण सोडू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याची व्यवस्था करत आहोत, असंही त्यांनी म्हटले आहे.
गुरुवारी एकूण ११० भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले. त्यांना इराणमधून सीमेपलीकडून आर्मेनियाला नेण्यात आले. हुसैनी म्हणाले की, इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय राहत आहेत आणि ज्यांना घरी परतायचे आहे त्यांना बाहेर काढले जात आहे.