अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारतातील कृषी आणि दुग्ध उद्योग संकटात? लोकसभेत गदारोळ, पीयूष गोयल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:19 IST2026-02-04T13:16:30+5:302026-02-04T13:19:27+5:30
India US Trade Deal: भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्यापार करारावरून आज लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. गदारोळादरम्यान पीयूष गोयल यांनी या करारात भारत आपल्या संवेदनशील हितांचं रक्षण करण्यात यशस्वी ठरला, असे सांगितले.

अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारतातील कृषी आणि दुग्ध उद्योग संकटात? लोकसभेत गदारोळ, पीयूष गोयल म्हणाले...
भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्यापार करारावरून आज लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. या करारामुळे भारतीय बाजारपेठ ही अमेरिकन कृषी उत्पादनांना खुली होणार असून, त्यामुळे भारतामधील कृषी आणि दुग्ध व्यवसाय संकटात सापडणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच या मुद्द्यावरून आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे लोकसभेमध्ये निवेदन देत असताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. तर या गदारोळादरम्यान पीयूष गोयल यांनी या करारात भारत आपल्या संवेदनशील हितांचं रक्षण करण्यात यशस्वी ठरला, असे सांगितले. मात्र पीयूष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज २ तासांसाठी तहकूब करावे लागले.
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या टॅरिफ वॉरनंतर भारत आणि अमेरिकेमधील व्यापार करारा मार्गी लागल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याला दुजोरा दिला होता. मात्र या करारामुळे अमेरिकेतील कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आझ लोकसभेमध्ये निवेदन देताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, या व्यापारी करायाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतवर्षी झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केला. या करारामधून भारत आपल्या संवेदनशील हितांचं रक्षण करण्यात यशस्वी ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कराराबाबत अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अखेरीस अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ ५० टक्क्यांवरून घटवून १८ टक्क्यांपर्यंत कमी केले. टॅरिफचा हा दर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. तसेच कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये आम्ही भारताच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. भारत आणि अमेरिका या एकमेकांना पूरक असलेल्या अर्थव्यवस्था आहेत. अमेरिका डेटा आणि ऊर्जा क्षेत्रामधील अग्रेसर देश आहे. तसेच आमच्यासाठी या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं अनिवार्य आहे. या करारानंतर अनेक क्षेत्रांमध्ये भारताची निर्यात अमेरिकेपेक्षा अधिक वाढणार आहे. तसेच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशासोबतचा हा करार नवनिर्मितीला गती देईल. हा करार भारताच्या हितामध्ये असून, त्यामधून देशाला खूप लाभ होईल.