आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने इराणकडून खरेदी केला गॅस, LPG घेऊन भारतात येतंय सी बर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:17 IST2026-03-26T13:14:11+5:302026-03-26T13:17:10+5:30
Iran War News: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा विपरित परिणाम भारताला होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी वितरण एजन्सींसमोर रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपांसमोरही रांगा लागल्या आहेत. या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने इराणकडून खरेदी केला गॅस, LPG घेऊन भारतात येतंय सी बर्ड
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा विपरित परिणाम भारताला होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी वितरण एजन्सींसमोर रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपांसमोरही रांगा लागल्या आहेत. या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुमारे आठ वर्षांनंतर भारताने इराणकडून एलपीजी खरेदी केला आहे. सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने हा गॅस खरेदी केला असून, त्यात इंडियन ऑईलसोबत भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचीही भागीदारी आहे.
भारताने याआधी जून २०१८ मध्ये इराणकडून शेवटचा एलपीजी खरेदी केला होता. त्यानंतर भारताने इराणकडून खरेदी बंद केली होती. त्यानंतर अमेरिकेने लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे भारताचा इराणसोबत असलेला व्यापार पूर्णपणे बंद झाला होता. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या मार्गाची इराणने नाकेबंदी केली आहे. त्यामुळे जगभरातील तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत भारत आपल्या एलपीजीच्या गरजेपैकी दोन तृतियांश एलपीजीची आयात करतो. तसेच त्यापैकी ९० टक्के गॅस हा आखाती देशांमधून आयात केला जातो
अशा परिस्थितीत जेव्हा पुरवठा साखळी तुटू लागल्याने भारतात गॅसचा तुटवडाही जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी लोक पुन्हा एकदा चुकीच्या वापराकडे वळले आहेत. तर अनेक ठिकाणी एलपीजी सिलेंडरसाठी लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, भारताने सुमारे ४३ हजार टन एलपीजी खरेदी केला आहे. हा एलपीजी भारताच्या दैनंदिन गरजेपैकी अर्ध्या दिवसाची गजर भागवू शकतो. मात्र संकट काळामध्ये एवढा पुरवठाही दिलासादायक मानला जात आहे. हा गॅस सी बर्ड नावाच्या जहाजामधून भारतात आणला जात आहे. तसेच तो आज मंगळुरू बंदरात आणला जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे जहाज आधी चीनमध्ये जाणार होते. मात्र अचानक ते भारताकडे वळले. यादरम्यान, भारत आणखी दोन एलपीजीने भरलेली जहाजे आणण्याची तयारी करत आहे. तसेच याबाबतची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे.