श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 12:35 IST2021-08-23T12:24:12+5:302021-08-23T12:35:00+5:30

Union Minister A Narayanaswamy : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले.

instead of martyr union minister narayan swami reached house of living soldier to pay homage | श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही...

श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही...

नवी दिल्ली - श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी कर्तव्यावर असलेल्या सैनिकाच्या घरी केंद्रीय मंत्री पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री ए नारायणस्वामी (Union Minister A Narayanaswamy) गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले. तसेच जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिल्याने हे घडले असल्याचं सांगितलं जात आहे. नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात नुकतेच मंत्री झालेले नारायणस्वामी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा भाग म्हणून गाडग जिल्ह्यात होते. त्यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाच्या घरी गेले. 

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांना वर्षभरापूर्वी पुण्यात आपला जीव गमावलेल्या बसवराज हिरेमठ यांच्या ऐवजी जवान रविकुमार कट्टीमनी यांच्या घरी नेण्यात आले, जे सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहेत. ए नारायणस्वामींच्या यात्रेनुसार ते शहीद जवानाच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करणार होते. नारायणस्वामी खासदार शिवकुमार उदासीसह मुलगुंड भागात पोहोचले, जिथे त्यांना कट्टीमनी यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यामुळे जवानाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

जवानाच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणा मंत्र्यांनी केली तेव्हा कुटुंबीयांना धक्का बसला आणि सारेच जण हैराण झाले. नंतर भाजपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने रविकुमार कट्टीमनी यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्याने ए नारायणस्वामींसोबत संवाद साधला. जेव्हा नारायणस्वामींना त्यांच्या चुकीबद्दल कळले तेव्हा त्यांनी परिस्थिती हाताळल्याबद्दल जवानाचे कौतुक केले आणि त्याच्या कुटुंबाचा देखील सन्मान केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी नंतर या चूकीसाठी स्थानिक भाजपा नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, नंतर मंत्री शहीद जवान हिरेमठ यांच्या घरी गेले नाहीत. "आमच्या घरी कोणी आले नाही. मंत्री जिवंत असलेल्या एका जवानाच्या घरी गेले. मला माझा मुलगा परत हवा आहे" असे शहीद जवानाच्या आईने म्हटलं आहे. या घटनेनंतर काही नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: instead of martyr union minister narayan swami reached house of living soldier to pay homage