भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:53 IST2025-06-01T12:51:19+5:302025-06-01T12:53:04+5:30
CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : 'आम्ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, आता हे युद्ध संपवायचे आहे.'

भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी(1 जून) ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणावर अतिशय स्पष्टपणे भाष्य केले. सिंगापूरमध्ये झालेल्या शांगरी-ला संवाद सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारताच्या ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्ध एक नवीन 'लाल रेषा' आखली आहे. पाकिस्तान भारताच्या लष्करी कारवाईतून नक्कीच काही धडे घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारत-पाक युद्धाच्या उंबरठ्यावर
सीडीएस अनिल चौहान पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट करणे होता. त्यानंतर, या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानी हल्ल्यांनाही प्रत्युत्तर देण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते, पण 10 मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला.
पाकिस्तानच्या आत 300 किमी घुसून हल्ले केले
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने स्वदेशी शस्त्रे आणि मित्र देशांकडून मिळालेल्या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानमध्ये 300 किमी आत घुसून हल्ले केले. हे आमच्या मजबूत हवाई संरक्षण क्षमतेचे प्रतीक आहे. दहशतवाद्यांमुळे जगात अस्थिरता वाढत आहे आणि पाकिस्तान संघर्षांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मला आशा आहे की या विशेष ऑपरेशनमधून आपल्या शत्रूंनाही काही धडे मिळतील आणि ते यापुढे भारताच्या सहनशीलतेचा फायदा घेणार नाहीत, अशी आशाही अनिल चौहान यांनी व्यक्त केली.
यापुढे प्रॉक्सी युद्ध सहन करणार नाही
अनिल चौहान पुढे म्हणतात, आम्ही दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, यामुळे अनेक लोक गमावले आहेत. आता आम्हाला ते संपवायचे आहे. ऑपरेशननंतर भारताला धोरणात्मक स्थिरता वाटते का असे विचारले असता, सीडीएस म्हणाले की, धोरणात्मक स्थिरता आणण्यासाठी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवाव्या लागतात, असे सूचक विधान त्यांनी केले.
भारतीय सैन्याचे किती नुकसान?
या संभाषणादरम्यान, जनरल चौहान यांनी कबूल केले की, सुरुवातीच्या दिवशी भारताला हवाई नुकसान सहन करावे लागले. पण, त्यांनी कोणताही अचूक आकडा दिला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला झालेल्या नुकसानीशी संबंधित प्रश्नावर अनिल चौहान म्हणाले की, म्हणजे किती नुकसान झाले हे महत्वाचे नाही, तर कोणत्या चुका झाल्या? हे महत्वाचे आहे. आकडेवारी महत्त्वाची नाही, त्यानंतर आपण काय केले हे महत्त्वाचे आहे. आपण युद्धाच्या वातावरणात आहोत आणि नुकसान त्याचाच एक भाग आहे. प्रश्न असा आहे की, आपण आपले उद्दिष्ट साध्य केले आहे का? हो. अद्याप संघर्ष शमलेला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.