पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कराकट येथे झालेल्या भव्य सभेत ४८,५२० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी दहशतवादाविरोधातील देशाच्या लढ्याचा पुनरुच्चार केला. तसेच, नक्षलवादाच्या विरोधातील यशस्वी मोहिमेवर प्रकाश टाकला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज बिहारच्या पवित्र भूमीवरून विकासाला नवी चालना देण्याचा संकल्प पूर्ण करत आहे. ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाल्याचा मला अभिमान आहे.” यावेळी त्यांनी उपस्थित मातांसह भगिनींच्या मोठ्या संख्येतील सहभागाबद्दल विशेष उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली.
दहशतवादाविरोधातील कारवाईचे वर्णन
पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, "ज्यांनी पाकिस्तानातून आमच्या देशावर हल्ले घडवले, त्यांच्या लपण्याच्या जागा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. भारत आता जुना राहिलेला नाही; नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली आहे."
त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत म्हटले की, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर कठोर प्रहार केला. “भारतीय सैन्याच्या साहसामुळे जगाने आमच्या सिंदूरची ताकद पाहिली आहे,” असे ते म्हणाले.
बीएसएफ जवानांचे शौर्य आणि बलिदान
मोदींनी बीएसएफच्या उपनिरीक्षक इम्तियाज यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. "आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अभेद्य ढाल बनून उभे राहिले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांच्या शौर्याला संपूर्ण जगाने सलाम केला आहे," असे ते म्हणाले.
नक्षलवादाविरोधातील लढ्यात मोठे यश
नक्षलप्रभावित भागांबाबत बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, "२०१४ पूर्वी १२५ जिल्हे नक्षलग्रस्त होते, तर आता ही संख्या केवळ १८ वर आली आहे. रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, रस्ते आणि रोजगाराच्या संधी आता नक्षलग्रस्त भागांमध्ये पोहोचत आहेत. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा माओवादी हिंसाचार पूर्णतः नष्ट होईल.”