भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:18 IST2025-06-16T15:18:11+5:302025-06-16T15:18:38+5:30
Israel vs India War: इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे.

भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
भारतावर तीन वर्षांनी पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती उद्भवली आहे. भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. रशियाने हल्ले चढविल्यानंतर हे विद्यार्थी मिसाईलच्या छायेत अडकले होते. तेव्हा एअर इंडियाच या विद्यार्थ्यांसाठी धावून गेली होती. या विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशात आणण्यासाठी एअर इंडियाची विमाने अहोरात्र उड्डाणे करत होती. आताही भारतावर तीच परिस्थिती आली आहे, सुमारे दीड हजार भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत.
इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे. १०-१५ वेळा प्रयत्न केला तर कुठे जाऊन १ फोन लागत आहे, आमची मुले तिथे सुरक्षित नाहीत. सरकारने त्यांना बाहेर काढावे, असे आवाहन पालकांनी केले आहे. याचबरोबर इराक आणि पाकिस्तानने त्यांची मुले इराणमधून बाहेर काढली आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.
बहुतांश विद्यार्थी हे काश्मीरचे आहेत. इराण आणि काश्मीर यांचा जवळचा संबंध आहे. शिया बहुल मुस्लिम आणि इराण यांचा ऐतिहासिक संबंध असल्याने जेव्हा जेव्हा इराणवर हल्ला होतो तेव्हा काश्मीर घाटीत, कारगिलमध्ये हे मुस्लिम नागरिक आंदोलने करतात. यावेळीही केली आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इस्रायलने १५ जूनला दुपारी हजत दोस्त अली हॉस्टेलवर हल्ला केला आहे. यात काही काश्मीरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. या युद्धात १५०० भारतीय विद्यार्थी अडकले असल्याचे काश्मीरच्या रेहाना अख्तर हिने म्हटले आहे. दुसरीकडे इस्रायलमध्येही हमासपेक्षाही जास्त भयावह स्थिती आहे. केरळचा सूरज रंजन हा विद्यार्थी तिथे शिकत आहे. त्याने यावेळी परिस्थिती सर्वात भयानक आहे, असे म्हटले आहे. भारत आता कोणते पाऊल उचलतो याकडे या पालकांचे लक्ष लागले आहे.