एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात उकाड्याचा कहर; नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 06:38 IST2026-04-01T06:38:08+5:302026-04-01T06:38:20+5:30
मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात उकाड्याचा कहर; नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा
नवी दिल्ली: पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये, तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात, एप्रिल ते जून या कालावधीत नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी आपल्या मासिक अंदाजात नमूद केले.
या तीन महिन्यांदरम्यान, देशाच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान 'सामान्य' किंवा 'सामान्यपेक्षा कमी' राहण्याची अपेक्षा आहे. याला अपवाद म्हणजे पूर्व आणि ईशान्य भारताचा बहुतांश भाग, तसेच मध्य भारताचा पूर्व भाग आणि त्याला लागून असलेला द्वीपकल्पीय प्रदेश असतील. या ठिकाणी कमाल तापमान 'सामान्यपेक्षा जास्त' राहण्याची शक्यता आहे. तिथे उष्णतेच्या लाटेचा सामना लोकांना करावा लागेल.
महाराष्ट्रात काय स्थिती ?
उष्णतेच्या कालावधीत (एप्रिल-मे-जून), देशाच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 'सामान्यपेक्षा जास्त' राहण्याची शक्यता आहे. याला अपवाद महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही प्रदेशांमधील भाग असतील.
एप्रिलमध्ये पर्जन्यमान 'सामान्यपेक्षा जास्त'
एप्रिल २०२६ मध्ये, संपूर्ण देशाचा सरासरी विचार करता, पर्जन्यमान 'सामान्यपेक्षा जास्त' राहण्याची शक्यता आहे. याला अपवाद ईशान्य भारताचा असेल, असे आयएमडीने म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन
भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार बुधवारी मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २ शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे, तसेच यात्रास्थळे व मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वत्तीने करण्यात आले आहे.