"आई, मी संन्यास घेतोय..."; मुलगा घर सोडून बेपत्ता; फोनच्या सर्च हिस्ट्रीने पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:47 IST2026-02-22T11:45:09+5:302026-02-22T11:47:13+5:30
बारावीत शिकणाऱ्या निखिल कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचा पाच दिवस उलटूनही अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही.

फोटो - जागरण
बिहारच्या पकडी मिश्राइन गावच्या पोलीस ठाणे हद्दीतील बारावीत शिकणाऱ्या निखिल कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचा पाच दिवस उलटूनही अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. घर सोडण्यापूर्वी निखिलने आपल्या आईच्या नावे एक भावूक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्याने आपल्याला होत असलेल्या मानसिक त्रासाचा आणि संन्यास घेण्याचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान त्याच्या मोबाईलच्या 'सर्च हिस्ट्री'मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारीच्या रात्री निखिल जेवून आपल्या खोलीत झोपायला गेला होता. रात्री दोन वाजेपर्यंत तो आपल्या अंथरुणावरच होता, असं त्याच्या आईने सांगितलं. मात्र, सकाळी पाच वाजता आई त्याला उठवायला गेली असता खोली रिकामी आढळली. सुरुवातीला तो परीक्षेला गेला असावा असं वाटलं, पण तो परीक्षा केंद्रावर पोहोचलाच नाही. त्यानंतर त्याच्या खोलीत आईच्या नावे लिहिलेलं एक पत्र सापडलं ज्यामध्ये त्याने ६०० रुपये घेऊन संन्यास घ्यायला जात असल्याचं म्हटलं होतं.
निखिलचे वडील पॅरालिसिसने आजारी आहेत, त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी निखिलवरच होती. तो शिकून कुटुंबाचा आधार बनेल, अशी आशा घरच्यांना होती. पत्र वाचल्यापासून त्याच्या आईची प्रकृती खालावली आहे. कुटुंबीयांना वृंदावनमधून एक फोन आला होता, ज्यामध्ये निखिल एका बाबांकडे बसलेला असल्याचं सांगण्यात आलं, मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
पोलीस तपासात निखिलच्या मोबाईलची ब्राउझिंग हिस्ट्री तपासली असता, त्यात जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्न सर्च केल्याचं आढळलं आहे. यामुळे पोलिसांची चिंता वाढली असून ते सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
तपासादरम्यान एका ऑटो चालकाने माहिती दिली की, पहाटे चारच्या सुमारास निखिल त्याच्या रिक्षाने उत्तर प्रदेशच्या सीमेकडे गेला होता. पोलीस आता रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निखिलचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत.