गोदावरी पात्रात सेल्फीच्या नादात मोठा अपघात! फोटो काढताना ५ विद्यार्थी बुडाले; आंध्र प्रदेशात शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:00 IST2026-03-20T19:53:27+5:302026-03-20T20:00:05+5:30
गोदावरी नदीत पोहायला गेलेल्या पाच तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला

गोदावरी पात्रात सेल्फीच्या नादात मोठा अपघात! फोटो काढताना ५ विद्यार्थी बुडाले; आंध्र प्रदेशात शोककळा
Andhra Pradesh Accident: उगादी सणाच्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी गोदावरी नदीत पोहायला गेलेल्या पाच तरुणांचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या भद्राचलम जवळील गोदावरी नदीच्या पात्रात हे पाचही तरुण वाहून गेले असून, अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये अमरावती येथील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन बीटेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या एसआरएमटी कॉलेजमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे पाच मित्र आपला स्थानिक मित्र श्रीकर याला भेटण्यासाठी भद्राचलम येथे आले होते. शुक्रवारी हे सर्व सात मित्र एटापाका मंडळातील पुरुषोत्तम पटनम गावाच्या शिवारात असलेल्या कोल्लीगुडेम रॅम्पजवळ गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरले.
फोटो काढताना ओढावला काळ
नदीत पोहत असताना हे तरुण मोबाईलवर फोटो आणि सेल्फी काढण्यात मग्न होते. याच दरम्यान पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने सातही तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहाच्या विळख्यात सापडले. या भीषण प्रसंगातून दोन तरुणांनी कसाबसा पोहत काठावर येत आपला जीव वाचवला, मात्र दुर्दैवाने उर्वरित पाच जण डोळ्यादेखत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि बेपत्ता झाले. सतीश, नवदीप, तेजज्ञ, अभिराम, श्रीकर अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत.
युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच एटापाका आणि भद्राचलम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छिमार आणि स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र, नदीचा वेगवान प्रवाह आणि आव्हानात्मक परिस्थितीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.