वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:12 IST2026-04-07T10:11:07+5:302026-04-07T10:12:02+5:30
Crime News: प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक वादातून वडील आणि त्यांच्या दोन छोट्या मुलांचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची अजब घटना घडली आहे.

वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
वडील आणि त्यांच्या दोन छोट्या मुलांचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची अजब घटना घडली आहे. या अपहरणकर्त्यांनी हरयाणामधील गुरुग्राम येथील ऑटोचालक मनोज आणि त्याच्या दोन मुलांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर हे अपहरणकर्ते मयूर आणि लक्ष्य या दोन मुलांना बोलेरो गाडीतून अज्ञात ठिकाणी नेत होते. यादरम्यान, बरेली-रामपूर महामार्गावर त्यांच्या बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात मनमोहन, सिकंदर आणि विशेष या अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रिंस नावाचा चौथा अपहरणकर्ता जखमी झाला आहे. कौटुंबिक वाद आणि प्रेमप्रकरणातून हे अपहरणनाट्य घडलं होतं. तसेच आरोपींनी खंडणी आणि धमकावण्याचे कृत्य केले होते, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासामधून समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार रविवारी संध्याकाळी एका भरधाव बोलेरो कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना बरेलीमधील सीबीगंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ही धडक एवढी भीषण होती की, यात कारचा चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. अपघातग्रस्त गाडीमध्ये तीन तरुणांचे मृतदेह अडकले होते. तर एक तरुण आणि दोन मुले बेशुद्धावस्थेत सापडले. पोलिसांनी जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले. मात्र घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांना अपहरणाचा संशय आला.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शनिवार ४ एप्रिल रोजी गुरुग्राममधील डीएलएफ फेज-१ परिसरातून ऑटो चालक मनोज आणि त्याचे मयूर आणि लक्ष्य हे दोन मुलगे यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली. तसेच अपहरणकर्त्यांनी माझ्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मनोजची पत्नी पूजा हिने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी नियोजनबद्ध तपास करत अपहरणकर्त्यांचे षडयंत्र हाणून पाडले.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेला मुख्य अपहरणकर्ता मनमोहन हा फरीदपूर येथील रहिवासी नत्थू याचा मुलगा होता. त्याचे मनोजच्या भाचीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. तसेच मनमोहन याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र मनोजचा या लग्नाला विरोध होता. यामुळेच मनमोहन याने मनोज आणि त्याच्या दोन मुलांचं अपहरण केलं होतं. दरम्यान, पोलिसांनी मनोज याची फरीदपूर येथील नत्थूच्या घरातून सुखरूप सुटका केली आहे. तर मनोजचे दोन्ही मुलगे भीषण अपघातात सुदैवाने बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता या प्रकरणी चौथा आरोपी प्रिंस याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.