‘हिंदूंनी प्रत्येकी ४ मुलांना जन्म द्यावा, लग्नानंतर मीसुद्धा…’ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:59 IST2026-02-24T11:58:48+5:302026-02-24T11:59:40+5:30
Dhirendra Krishna Shastri News: बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करत हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा, असं आवाहन केलं आहे.

‘हिंदूंनी प्रत्येकी ४ मुलांना जन्म द्यावा, लग्नानंतर मीसुद्धा…’ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं विधान
गेल्या काही दिवसांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापासून ते इतर अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी आणि धार्मिक गुरूंनी भारतातीलहिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच हिंदू दाम्पत्यांनी अधिकाधिक मुलांना जन्म द्यावा असं आवाहन यापैकी अनेकांनी केलं आहे. आता बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करत हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा, असं आवाहन केलं आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे हनुमान कथेसाठी पुष्करच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले आहेत. या दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदूंची घटती लोकसंख्या आणि भारतीय मुस्लिमांच्या घरवापसीबाबत आपलं मत मांडलं. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, हा एक मोठा जागतिक विषय आहे. विशेषकरून भारतात हा मोठा मुद्दा आहे. घटत असलेले हिंदू आणि वाढत असलेले धर्मांध हे देशाला उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, हिंदूंनी किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे. माझं लग्न झालेलं नाही. त्यामुळे लोक माझ्या विधानावर प्रतिक्रिया देतील, लोकसंख्या वाढीमध्ये तुमचं योगदान काय आहे? असं विचारतील. मात्र जेव्हा माझं लग्न होईल, तेव्हा मीसुद्धा हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यामध्ये योगदान देईन.
यावेळी भारतीय मुस्लिमांच्या घरवापसीबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, भारतीय मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते. अमर, अकबर, अँथोनी नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या शेवटी या तिघांचेही वडील कन्हैयालाल असल्याचे समोर आले होते. आता ही बाब त्यांना समजली तर त्यांची घरवापसी निश्चितच होईल, असेही धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले.