हिप्परगी बॅरेजचे गेट तुटून अडीच टीएमसी पाणी वाया, उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवणार; कर्नाटक सरकारने काय केलं नियोजन..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 19:06 IST2026-01-21T19:05:56+5:302026-01-21T19:06:43+5:30
उन्हाळ्यातील संभाव्य टंचाईवर कर्नाटकची उपाययोजना

हिप्परगी बॅरेजचे गेट तुटून अडीच टीएमसी पाणी वाया, उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवणार; कर्नाटक सरकारने काय केलं नियोजन..वाचा
अथणी : कर्नाटकात जमखंडीजवळील हिप्परगी बॅरेजचे एक गेट तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. आतापर्यंत सुमारे अडीच टीएमसी पाणी कृष्णा नदीपात्रातून वाहून गेले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात प्रसंगी महाराष्ट्राकडून पैसे भरून पाणी घेण्याचे नियोजन कर्नाटक सरकारने केले आहे.
आमदार राजू कागे यांनी माहिती दिली की, यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहोत. पाण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचीही लवकरच भेट घेणार आहोत. ते कौलगुड (ता. अथणी) येथे शाळेच्या बांधकाम शुभारंभप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, बॅरेजचे गेट न तत्काळ दुरुस्त न केल्यामुळे अडीच टीएमसी पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे या भागात उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या जाणवणार आहे.
पाण्यासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदामंत्री व मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करण्यात येणार आहे. चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्केरी, आमदार प्रकाश हुक्केरी, जमखंडीचे आमदार जगदीश गुळगुंटी, आमदार सिद्धू सवदी, लक्ष्मण सवदी, महेंद्र तमन्नावर आदींचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
गेल्या जानेवारी महिन्यात धरणाचे २२ क्रमांकाचे गेट तुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले होते. या बॅरेजची साठवण क्षमता ६ टीएमसी असून, गळतीमुळे त्यामध्ये घट झाली आहे. कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने गेटची दुरुस्ती युद्धस्तरावर केली. तरीही येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावण्याची भीती आहे.