वाचळ नेत्यांच्या वक्तव्यांची भाजपा नेतृत्वाकडून गंभीर दखल, बजावली कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:09 IST2019-05-17T13:07:37+5:302019-05-17T13:09:05+5:30
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाचा वाचाळ नेत्यांनी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत.

वाचळ नेत्यांच्या वक्तव्यांची भाजपा नेतृत्वाकडून गंभीर दखल, बजावली कारणे दाखवा नोटीस
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाचा वाचाळ नेत्यांनी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्याने उदभवलेला वाद साध्वींच्या माफीनाम्यामुळे शांत होत असतानाच अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी साध्वीची री ओढत आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे भाजपाची चांगलीच गोची झाली असून, या नेत्यांच्या वाचाळगिरीची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा पक्षाक्षी काहीही संबंध नाही, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तसेच या नेत्यांच्या वक्तव्यांची दखल पक्षाच्या शिस्तपालन समितीने घेतली असून, त्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले की, साध्वी प्रज्ञा सिंह, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी केलेली वक्तव्ये ही त्यांचे वैयक्तिक मत आहे. भाजपाचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागितली आहे. मात्र भाजपाने या वक्तव्यांची गंभीर दखल घेतली असून, त्यांची वक्तव्ये शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहेत. तसेच शिस्तपालन समितीने या नेत्यांना दहा दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
Amit Shah:Statements of Ananthkumar Hegde,Pragya Thakur&Nalin Kateel are their personal opinion,BJP has nothing to do with it.They have withdrawn their statements&apologized. BJP has taken their statements seriously and sent these statements to disciplinary committee (file pic) pic.twitter.com/8ZJYAIeKBl
— ANI (@ANI) May 17, 2019
महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, असे विधान अभिनेता कमल हसन यांनी केले होते, त्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त होता, आहेत आणि राहील, अशा शब्दात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. मात्र वाद वाढल्यावर त्यांनी माफी मागितली होती. मात्र नंतर अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी साध्वींच्या वक्तव्याचा आधार घेट ट्विट केले होते.
BJP President Amit Shah: The disciplinary committee will seek explanation from all the three leaders and will submit the report to the party within 10 days https://t.co/oQ8FyQsgSq
— ANI (@ANI) May 17, 2019