राहुल गांधींवर आजीवन निवडणूक बंदी घालण्याची मागणी, भाजप खासदाराचा संसदेत प्रस्ताव; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:14 IST2026-02-12T13:13:04+5:302026-02-12T13:14:06+5:30
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप कमालीची आक्रमक झाली आहे.

राहुल गांधींवर आजीवन निवडणूक बंदी घालण्याची मागणी, भाजप खासदाराचा संसदेत प्रस्ताव; नेमकं प्रकरण काय?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. मात्र, आता या वादाने टोकाचे वळण घेतले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप कमालीची आक्रमक झाली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात थेट 'सबस्टँटिव्ह मोशन' सादर करत, त्यांची खासदारकी रद्द करण्याची आणि त्यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे वादाचे मूळ?
बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. भारत-अमेरिका व्यापार कराराचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, "सरकारने देशाला अमेरिकेच्या हाती विकले आहे, भारत मातेचा सौदा केला आहे." राहुल गांधींच्या या विधानानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटले की, "आजपर्यंत असा कोणीही जन्माला आलेला नाही जो भारताला विकत घेऊ शकेल."
निशिकांत दुबे यांचा थेट प्रहार
राहुल गांधींच्या या विधानाला 'देशाची दिशाभूल करणारे' ठरवत खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत प्रस्ताव मांडला. दुबे यांचा आरोप आहे की, राहुल गांधी अशा शक्तींच्या मदतीने देशाला भ्रमित करत आहेत, ज्यांना भारताचे नुकसान करायचे आहे. त्यांनी केवळ राहुल गांधींच्या सदस्यत्वावरच गदा आणण्याची मागणी केली नाही, तर भविष्यात त्यांनी कधीही निवडणूक लढवू नये, असे निर्बंध घालण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांना केली आहे.
#WATCH | On LoP, Lok Sabha, Rahul Gandhi's statement in Parliament, BJP MP Nishikant Dubey says," I have moved a motion in Lok Sabha today against Rahul Gandhi on how he is misleading the nation with the help of forces like Soros, who want to harm the nation. In the motion I have… pic.twitter.com/MECVIGHdyh
— ANI (@ANI) February 12, 2026
भाजपचा जुन्या संदर्भांनी पलटवार
या वादात भाजप खासदार जगदंबिका पाल यांनीही उडी घेतली आहे. २०१३ मधील डब्लूटीओ कराराची आठवण करून देत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. "तेव्हाच्या करारात आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते, पण २०१७ मध्ये पंतप्रधान मोदींनी तो निर्णय बदलला. मग तेव्हा काँग्रेसने देश विकला होता का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ४ थ्या स्थानावर पोहोचली असताना राहुल गांधी असे आरोप करून देशाची प्रतिमा मलीन करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
प्रियंका गांधींकडून भावाचे समर्थन
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रियंका गांधी वाड्रा यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटले की, "सरकारने केलेल्या व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी मजूर संघटना संपावर आहेत आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. भाजप राहुल गांधींविरोधात कितीही तक्रारी किंवा खटले दाखल करो, त्यांच्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही."
काय असते 'सबस्टँटिव्ह मोशन'?
हा संसदेतील एक असा औपचारिक प्रस्ताव असतो जो अत्यंत गंभीर विषयावर मांडला जातो. एखाद्या सदस्याच्या वर्तणुकीवर किंवा विधानावर कारवाई करण्यासाठी हा प्रस्ताव वापरला जातो. आता हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही, याचा संपूर्ण अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे आहे.