दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर धावत्या कारनं अचानक घेतला पेट, पाच जणांचा होरपळून मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:54 IST2026-04-30T10:49:51+5:302026-04-30T10:54:28+5:30
Delhi-Mumbai Expressway Car Fire: अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर रात्री उशिरा एक भीषण दुर्घटना घडली.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर धावत्या कारनं अचानक घेतला पेट, पाच जणांचा होरपळून मृत्यू!
अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर रात्री उशिरा एक भीषण दुर्घटना घडली. धावत्या कारने अचानक पेट घेतल्यानंतर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, कारचालक थोडक्यात बचावला आहे. ही घटना मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास महामार्गावरील खांब क्रमांक ११५/३०० जवळ घडली. कार पेटण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी स्थानिक पोलीस तपास करीत आहेत.
उपअधीक्षक कैलाश जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका कारला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांसह एनएचएआयचे पथक आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कारमधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये तीन महिला, एक तरुणी आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
कारचा चालक विनोद कुमार मेहर, जो मध्य प्रदेशातील श्योपूरचाच रहिवासी आहे, त्याने जळत्या कारमधून बाहेर उडी मारून मोठ्या कष्टाने आपला जीव वाचवला. या घटनेत विनोद ८० टक्के भाजला आहे. त्याच्यावर पिनान येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारांसाठी अलवर येथे हलवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपशील जाणून घेतले आणि तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या घटनेत मरण पावलेल्यांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.