देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:41 IST2025-05-29T14:41:23+5:302025-05-29T14:41:52+5:30
Population Of India: एकीकडे लोकसंख्येमुळे भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलं तरी वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणेही तितकेच कठीण बनलेले आहे. अशा परिस्थितीत देशातील ४९ जिल्ह्यांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर?
स्वातंत्र्योत्तर काळात प्रचंड वाढलेली लोकसंख्या ही भारतासमोरील मोठं आव्हान बनलेली आहे. एकीकडे लोकसंख्येमुळे भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलं तरी वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणेही तितकेच कठीण बनलेले आहे. अशा परिस्थितीत देशातील ४९ जिल्ह्यांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या नागरिक नोंदणी डेटा २०२१ मधून ही माहिती उघड झाली आहे. सर्वसाधारणपणे भारतात उच्च जननदरामुळे लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मात्र अचानकपणे हा बदल दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा बदल दिसून आला आहे त्यापैकी बहुतांश जिल्हे हे दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये हा बदल अधिक प्रमाणात दिसून आला आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही परिस्थिती संपूर्ण देशामध्ये एकसारखी नाही आहे. मुख्यत्वेकरून दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिसून आली आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान, या क्षेत्रांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्युदर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. २०१९ मध्ये जन्मदरापेक्षा मृत्युदर अधिक असलेल्या जिल्ह्यांची संख्या केवळ ७ होती. मात्र २०२१ मध्ये मृत्युदर अधिक आहे अशा जिल्ह्यांची संख्या वाढून ४९ झाली आहे.
या ४९ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक जिल्हे हे तामिळनाडूमधील आहेत. २०१९ मध्ये तामिळनाडूमध्ये अशा जिल्ह्यांची संख्या शून्य होती. मात्र २०२१ मध्ये ही संख्या वाढून १७ झाली आहे. तामिळनाडूमध्ये एकूण ३७ जिल्हे आहेत. त्यामुळे हिशोब केल्यास हा आकडा सुमाने ५० टक्क्यांच्या आसपास आहे. ही आकडेवारी भारताच्या लोकसंख्येमधील एका संभाव्य बदलाकडे इशारा करणारी आहे. मात्र देशातील बहुतांश भागात लोकसंख्या वाढत आहे.
जन्मदरापेक्षा मृत्युदर वाढण्याची संभाव्य कारणं
वाढती वृद्धांची संख्या - दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जन्मदर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तसेच सरासरी आयुर्मान अधिक आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये वृद्धांची लोकसंख्या वाढत आहे. यामध्ये मृत्यूदरात वाढ होऊ शकते.
जन्मदरामध्ये घट - शिक्षण आणि जनजागृतीमुळे या भागामध्ये जन्मदरात लक्षणीय घट झालेली आहे.
कोरोनाच्या साथीचा प्रभाव - २०२१ मध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र आता जन्मदरातील घट ही कोरोनानंतरही कायम राहते की त्यात बदल होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.