चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 13:20 IST2021-05-19T13:19:41+5:302021-05-19T13:20:14+5:30

Coronavirus in India: कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी आकडेवारी सादर केली आहे.

Coronavirus: 98% of India's population still at risk of Coronavirus, so far only 2% infected | चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्ग

चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्ग

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या घटल्याने भारतातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे बोलले जात आहे. मात्र देशात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा अद्यापही मोठा असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India) मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी आकडेवारी सादर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत भारतातील केवळ २ टक्के लोकसंख्या कोरोनाच्या संसर्गामुळे प्रभावित झाली आहे. तर तब्बल ९८ टक्के लोकसंख्या ही अद्यापही धोक्याच्या छायेत आहे. (98% of India's population still at risk of Coronavirus, so far only 2% infected)

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती देताना सांगितले की, अन्य देशांमध्ये कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकसंख्येची टक्केवारी खूप अधिक आहे. मात्र भारत हे प्रमाण कमी राखण्यात यशस्वी झाला आहे. हे कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे शक्य झाले आहे. 

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संसर्गाचे रुग्ण सापडूनही आम्ही कोरोनाचा संसर्ग केवळ २ टक्के लोकसंख्येपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत. हे केवळ वैद्यकीय मदतीमुळे शक्य झाले आहे. 

मात्र काही लोकांनी सरकारकडून प्रसिद्ध करण्याच आलेल्या आकडेवारीबाबत शंका उपस्थित केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारने नॅशनल सीरो सर्व्हेच्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यामध्ये देशातील सुमारे २० टक्के लोकसंख्या कोरोनामुळे बाधित झाली असल्याचे सांगण्यात येत होते. इंडियन कौन्सिल ऑफ इंडिया (आयसीएमआर) कडून करण्यात आलेल्या सीरॉलॉजिकल सर्व्हेमध्ये देशातील २१.४ टक्के तरु लोकसंख्या गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधित झाली होती, असे सांगण्यात आले होते.  

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ६७ हजार ३३४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात ३ लाख ८९ हजार ८५१ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, दिवसभरात कोरोनामुळे ४ हजार ५२९ जणांचा मृत्यू झाल्याने भारतातील एकूण कोरोनाबळींची संख्या २ लाख ८३ हजार २४८ एवढी झाली आहे. सध्या भारतामध्ये तब्बल ३२ लाख २६ हजार ७१९ सक्रिय रुग्ण आहेत. 

Read in English

Web Title: Coronavirus: 98% of India's population still at risk of Coronavirus, so far only 2% infected