Corona Virus: परदेशात कोरोना रुग्णवाढ कायम, भारत सरकार सावध, लागू केली नवी गाइडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 18:44 IST2023-01-02T18:20:15+5:302023-01-02T18:44:47+5:30
Corona Virus: भारत सरकारने संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. रुग्णालयामध्ये योग्य व्यवस्था ठेवण्यासाठीच्या सूचना आधीच दिल्या गेल्या आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स लागू करण्यात आल्या आहेत.

Corona Virus: परदेशात कोरोना रुग्णवाढ कायम, भारत सरकार सावध, लागू केली नवी गाइडलाइन
चीन आणि जपानसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ती बाब विचारात घेऊन भारत सरकारने संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. देशात कोरोनाबाबत सतर्कता वेगाने वाढत आहे. रुग्णालयामध्ये योग्य व्यवस्था ठेवण्यासाठीच्या सूचना आधीच दिल्या गेल्या आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स लागू करण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्र्यालयाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ७२ तास आधीच्या आरटीपीसीआर चाचणीची कागदपत्र अपलोड करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ही व्यवस्था Transiting प्रवाशांसाठीही अनिवार्य करण्यात आली आहे. देशात आल्यानंतरही तपासणी केली जाईल, असे म्हटले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव झालेल्या देशांचा प्रवास करून भारतात आलेल्या प्रवाशांसाठी ७२ तास आधीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट अपलोड करणे आवश्यक असेल. तसेच सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरणेही आवश्यक असेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सोमवारी १७३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सक्रिय रुग्णांसी संख्या घटून २ हजार ६७० एवढी राहिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४६ लाख ७८ हजार ८२२ एवढी नोंदवली गेली आहे. तर मृतांची संख्या ही ५ लाख ३० हजार ७०७ एवढी आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक मृत्यू केरळमध्ये तर एक मृत्यू उत्तराखंडमध्ये नोंदवला गेल आहे.
दरम्यान, नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. एम. वली यांनी रविवारी सांगितले की, XBB.1.5 चा नवा व्हेरिएंट भारतामध्ये विषाणूजन्य नाही आहे. कारण ९० टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालेलं आहे. तसेच ३० ते ४० टक्के लोकांनी बुस्टर डोसही घेतला आहे.