“PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाचे राजकारण थांबायला हवे”; सोनिया गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:21 IST2022-04-16T17:20:42+5:302022-04-16T17:21:42+5:30

भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का, अशी विचारणा सोनिया गांधी यांनी केली आहे.

congress sonia gandhi criticised pm narendra modi govt and bjp over hindu muslim politics | “PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाचे राजकारण थांबायला हवे”; सोनिया गांधींची घणाघाती टीका

“PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाचे राजकारण थांबायला हवे”; सोनिया गांधींची घणाघाती टीका

नवी दिल्ली: अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. मात्र, आता कोल्हापूरमध्ये भाजपला चितपट करत काँग्रेस उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून आल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांचा राष्ट्रवाद बोगस आहे पण उन्माद कायमचा आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी केली. 

सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत, भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का? भारतातील नागरिकांनी असे वातावरण त्यांच्या हिताचे आहे, असा विश्वास स्पष्टपणे हवा आहे. पोशाख, आहार, श्रद्धा-भावना, सण वा भाषा असो, भारतीयांना भारतीयांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मतभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रत्येक प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी सोनिया गांधी यांनी लेख लिहिला आहे. यामध्ये केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत PM ची बरीच चर्चा

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत पंतप्रधानांकडून बरीच चर्चा होत आहे. पण त्याच्या कार्यकाळात शतकानुशतके आपल्या समाजाला परिभाषित आणि समृद्ध करणारी विविधता विभाजित करण्यासाठी वापरली जात आहे, हे कटू वास्तव आहे, असे सांगत आपल्याला आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवावा लागेल, जेणेकरून पैसा उभा होईल आणि मग हा पैसा पुन्हा वितरित केला जाऊ शकतो, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. सामाजिक उदारमतवादाची घसरलेली पातळी आणि धर्मांधतेचे ढासळणारे वातावरण, द्वेषाचा प्रसार आणि विभाजन यांमुळे आर्थिक विकासाचा पायाच डळमळीत होतो, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, आज आपल्या देशात द्वेष, धर्मांधता, असहिष्णुता आणि असत्याचे साम्राज्य पसरले आहे. जर आपण हे थांबवले नाही तर तो आपल्या समाजाला अशा प्रकारे नष्ट करेल की, ती पुन्हा पूर्ववत करणे कठीण होईल. आम्ही हे चालू ठेवू शकत नाही आणि देऊही नये. आम्ही व्यक्ती म्हणून उभे राहू शकत नाही आणि बोगस राष्ट्रवादावर शांतता आणि बहुलवादाचा त्याग पाहू शकत नाही, असे सांगत द्वेषाची त्सुनामी थांबवण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात केले आहे. सोनिया गांधी यांनी विस्तृत आणि सखोल लिहिलेल्या लेखात देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. 
 

Web Title: congress sonia gandhi criticised pm narendra modi govt and bjp over hindu muslim politics