अधीर रंजन : स्मृती इराणींचे 'ते' शब्द सोनिया गांधींना झोंबले; एवढ्या भडकल्या की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 14:12 IST2022-07-28T14:08:03+5:302022-07-28T14:12:00+5:30
Congress Sonia Gandhi and BJP Smriti Irani : संसदेचे कामकाज सुरू होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या.

अधीर रंजन : स्मृती इराणींचे 'ते' शब्द सोनिया गांधींना झोंबले; एवढ्या भडकल्या की...
काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला आहे. भाजपाने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली असून चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. काही भाजपा नेत्यांनी चौधरी यांचे वक्तव्य माफी मागण्या लायक नसल्याचे म्हटले आहे. गुरुवारी संसदेचे कामकाज सुरू होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या.
स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी याप्रकरणी माफी मागावी असं म्हटलं आहे. याच दरम्यान स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात वाद रंगलेला पाहायला मिळाला. इराणी यांच्या विधानावर सोनिया चांगल्याच संतापल्या आणि Dont talk to me असं म्हणून निघून गेल्या आहेत. गोंधळानंतर संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी बाहेर आल्या. याच दरम्यान भाजपाच्या काही नेत्यांनी सोनिया गांधी यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्द प्रयोग चौधरी यांनी केला होता. यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील टीका केली आहे. या साऱ्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. माफी मागण्याच्या मागणीवरून अधीर रंजन चौधरी यांनी माझ्याकडून चुकून राष्ट्राची पत्नी असा शब्द निघाला. एकदा चूक झाली तर मी काय करू? यावरून मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सोनिया गांधी यांनी अधीर चौधरी यांनी माफी मागितल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून जेव्हापासून त्यांच्या नावाची घोषणा झालीय तेव्हापासून द्रौपदी मुर्मू काँग्रेस पक्षाच्या द्वेषाची आणि उपहासाची लक्ष्य झाल्या आहेत. काँग्रेसने त्यांना कठपुतळी असे देखील संबोधले आहे. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदाला शोभेशा आहेत, हे सत्य अजून काँग्रेसला स्विकारता आलेले नाही, अशी टीका इराणी यांनी केली.