१४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात बेरोजगारांची संख्या जास्त आहे आणि नोकऱ्या कमी आहेत. प्रत्येकाला त्यामुळे प्रतिभा किंवा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. एका पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली तरी हजारो अर्ज येतात. या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी ही तरुणांची पहिली पसंती आहे.
बेरोजगारांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे असं अनेकांना वाटतं. पण त्याऐवजी सरकार नोकरीसाठी अर्ज केल्यावर १८% जीएसटी आकारत आहे. या प्रकरणावर वायनाडच्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाजपा तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही, पण परीक्षा फॉर्मवर १८% GST आकारून देशातील तरुणांच्या जखमेवर नक्कीच मीठ चोळत आहे. अग्निवीरसह प्रत्येक सरकारी नोकरीच्या फॉर्मवर जीएसटी वसूल केला जात आहे. फॉर्म भरल्यानंतर सरकारच्या अपयशामुळे पेपर फुटतो आणि भ्रष्टाचार झाला तर तरुणांचा हा पैसा बुडतो."
"पालक खूप काबाडकष्ट करतात, मेहनतीने पैसे जमा करून आपल्या मुलांना शिकवतात. मुलं परीक्षेची तयारी करतात, पण भाजपा सरकारने त्यांच्या स्वप्नांनाही आपल्या उत्पन्नाचं साधन बनवलं आहे" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रियंका यांच्या या पोस्टला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषत: तरुण वर्ग या मुद्द्यावर विविध प्रतिक्रिया देत आहे.