"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:51 IST2024-12-15T11:50:11+5:302024-12-15T11:51:03+5:30
"हरल्यानंतरही ते अहंकारी झाले आहेत. काँग्रेसने हे लक्षात ठेवायला हवे की, ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि भाजपने जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या विरोधी पक्षाला गेल्या तीन निवडणुकीतही जिंकता आलेल्या नाहीत..."

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान
देशातील विद्यमान आरक्षण व्यवस्थेसोबत कुठल्याही प्रकारे छेडछाड केली जाणार नाही. यावर नरेंद्र मोदी सरकार ठाम आहे. मात्र, काँग्रेसने मुस्लिमांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांचा कोटा देऊन आरक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे काम केले, असा आरोप केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत शाह पुढे म्हणाले, "हरल्यानंतरही ते अहंकारी झाले आहेत. काँग्रेसने हे लक्षात ठेवायला हवे की, ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि भाजपने जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या विरोधी पक्षाला गेल्या तीन निवडणुकीतही जिंकता आलेल्या नाहीत." शाह 'आज तक'च्या एका कार्यक्रमात बोलत होते.
शाह म्हणाले, 240 जागांसह विद्यमान मोदी सरकार आणि गेल्यावेळचे 303 जागा असलेले सरकार यांच्यात कुठलाही फरक नाही. कारण हे सरकार अजूनही, 'एक देश, एक निवडणूक', "असंवैधानिक" वक्फ कायद्यातील दुरुस्ती, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या. आपल्या आश्वासनांवर ठाम आहे.
नक्षलवादासंदर्भात बोलताना शाह म्हणाले, "भारत 31 मार्च 2026 पर्यंत नक्सल समस्येतून मुक्त होईल, अशा माझा ठाम विश्वास आहे. त्या दिशेने सुरक्षा दल काम करत आहेत. काही जिल्हे वगळता देशातील बहुतांश भागात नक्षलवादी हिंसाचार संपुष्टात आला आहे."
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात विचारले असता शाह म्हणाले, "केंद्रशासित प्रदेशात हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. तेथे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या आहेत. यावेळी, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या शक्यतेसंदर्भात बोलताना शाह म्हणाले, हे योग्य वेळी केले जाईल, मात्र, जाहीरपणे कोणतीही टाइमलाइन देऊ शकत नाहीत."