कुमारस्वामी-सिद्धरामय्यांमध्ये सत्तांतरावरून जुंपली; पोपट-गिधाडाची दिली उपमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 20:33 IST2019-09-24T20:32:23+5:302019-09-24T20:33:26+5:30
कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे.

कुमारस्वामी-सिद्धरामय्यांमध्ये सत्तांतरावरून जुंपली; पोपट-गिधाडाची दिली उपमा
बेंगळुरू : कर्नाटकमध्ये दोन महिने चाललेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामींना पायउतार व्हावे लागले होते. काँग्रेससह त्यांच्याच पक्षातील आमदारांनी सरकारविरोधात बंड पुकारत मुंबई गाठली होती. बरेच प्रयत्न करूनही या 15 आमदारांचे मन वळविण्यात जेडीएस आणि काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले होते. शेवटी कुमारस्वामींना राजीनामा द्यावा लागला होता. यामागे भाजपाचे य़ेडीयुराप्पा यांचा हात होताच, पण सिद्धरामय्यांचीही फूस असल्याची चर्चा होती.
कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आणि जेडीएसचे नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. सिद्धरामय्यांनी ट्विट करताना म्हटले की, चार दशकांच्या राजकीय अनुभवानंतरही मी गिधाडाला पोपट समजण्याची चूक केली आणि आघाडी केली. यानंतर कुमारस्वामींनी प्रत्यूत्तर देताना म्हटले की, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या संमतीने मी मुख्यमंत्री बनलो होतो. हीच गोष्ट सिद्धरामय्यांना पटली नाही, यामुळे सरकार जास्त काळ टिकले नाही.
यानंतर हा वाद काही शमन्याचे नाव घेत नाहीय. सिद्धरामय्या यांनी हुबळीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, कुमारस्वामी समजूतदारपणे बोलत नाहीत. त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि बंधू जी टी देवेगौडा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी म्हैसूर आणि चामराजनगरमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मत देण्याचे आदेश दिले होते. आता पोटनिवडणुका आल्या आणि ते नाटक करू लागलेत.
यावेळी सिद्धरामय्या यांनी एका लोकप्रिय कन्नड गीताचा हवाला दिला. या गीतामध्ये मालक एका पोपटाचे पालन पोषण करतो, मात्र नंतर तोच पोपट विश्वासघात करतो. सिद्धरामय्या यांनी या गीतातून कुमारस्वामींच्या आरोपांना उत्तर दिले. कुमारस्वामींना तुमकूरमधून एच डी देवेगौडा, मंड्यामधून निखिल कुमारस्वामी आणि कोलारमधून काँग्रेसचे उमेदवार मुनियप्पा यांच्या लोकसभेतील पराभवाला सिध्दरामय्यांना जबाबदार धरले होते.
सिद्धरामय्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितले होते की, लोकसभेनंतर एकही सेकंदासाठी कुमारस्वामींचे सरकार चालू देणार नाही, असे कुमारस्वामींना चेन्नापटनामध्ये सांगितले होते. सिद्धरामय्या यांनी राजकारण शिकविणाऱ्य़ा देवेगौडांचाच विश्वासघात केला आहे. मला नाही माहिती की सरकार का पडले, पण मी सिद्धरामय्यांचा पाळलेला पोपट नाही. रामनगरच्या लोकांनी मला सांभाळले आहे.