“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:08 IST2025-09-26T17:05:43+5:302025-09-26T17:08:53+5:30
CM Devendra Fadnavis Delhi PC News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पीएम केअर फंडाचा वापर करावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
CM Devendra Fadnavis Delhi PC News: पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे २७ किंवा २८ सप्टेंबर या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या उर्वरित काही भागात अतिवृष्टी होऊ शकते. सरकारही अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी जी काही सतर्कता त्यादृष्टीने घेता येईल, त्यांच्या परिने ती त्यांनी घ्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
आत्ता राज्यभरातील प्रचंड पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आपण घेत आहोत. त्यामुळे यासंदर्भात आधीच काही बोलणे योग्य होणार नाही आणि ते फायद्याचेही नाही. पूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्याचे स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला देणार आहोत. हे स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही. त्यामुळे ते एकदा तयार झाले की, याची माहिती दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडाचा वापर करावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही
पीएम केअर फंडासारखा एक फंड तयार करण्यासाठी तेव्हा केंद्र सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवानगी दिली होती. कोरोनात तो तयार झाला. ६०० कोटी रुपये त्या फंडात आले. एक नवा पैसा ते खर्च करू शकले नाहीत. आज अवस्था अशी झाली आहे की, सीएजीच्या नियमांप्रमाणे कोरोनासाठी तो फंड तयार झाला आहे, त्यामुळे तो इतरत्र खर्च करता येत नाही. या फंडाचे नेमके काय करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. लोकांनी ६०० कोटी रुपये या फंडाला दिले. या फंडात ६०० कोटी रुपये असताना, लोक तिथे पटापट मरत असताना, ते एक नवा पैसा खर्च करू शकले नाहीत. त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावे, हेदेखील ठरवले पाहिजे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, सरकारने हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. पावसाने तुमची शेती नाही तर आयुष्य वाहून गेले आहे. प्रत्येकवेळी यावेळी योग्य निर्णय घेऊ असे सांगता, तुमची ही योग्य वेळ कधी येणार आहे? का यासाठीही तुम्ही पंचांग पाहणार आहात? असा थेट सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एका प्रकार नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत सुरू केला. जेव्हा नैसर्गिक, वैद्यकीय संकट, आपत्ती येईल, अशा वेळेला या फंडातून मोठ्या प्रमाणात मदत करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयात वापर करता येईल. त्या पीएम केअर फंडात मुंबईसारख्या शहरातून सव्वा दोन लाख कोटी रुपये जमा झाले. त्या पैशांचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.