नवी दिल्ली - बिहारमध्ये मेंदूज्वर(एईएस) आजारामुळे आत्तापर्यंत 170 बालकांचा मृत्यू झाला असून या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करण्यात आली. बिहारमधील बालकांच्या मृत्युप्रकरणी सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार, उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने मेंदूज्वरमुळे लहान मुलांचे होणारे मृत्यू गांभीर्याने घेतलं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारने एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम(एईएस)मुळे पिडीत मुलांच्या उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य, आहार आणि स्वच्छता या संबंधी काय काय सुविधा दिल्या आहेत यावर 7 दिवसात उत्तर मागविलं आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये मागणी करण्यात आली आहे की, कोर्टाकडून बिहार सरकारला आरोग्य सुविधा वाढविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारलाही निर्देश देण्याचे आदेश द्यावेत असं म्हटलं आहे.
मेंदूज्वर हा आजार अस्वच्छतेतून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसार, लिची फळाचा आहारात अनुचित समावेश, उष्माघात ही कारणे त्यामागे आहेत. या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसींबाबत जागरूकता न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या बैठकीतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. १०० हून अधिक बालकांच्या मृत्यूनंतर आयोजित बैठकीत बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी क्रिकेट मॅचचा स्कोर विचारला. बालमृत्यूच्या गंभीर विषयावर बैठक सुरू असताना क्रिकेट मॅचचा स्कोर विचारणे धक्कादायक मानले जात होते. यावर अनेक स्तरातून टीका होऊ लागली.