बिहार: पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता; १८ जिल्हे, १२१ जागांसाठी ६ नोव्हेंबरला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:58 IST2025-11-05T12:57:58+5:302025-11-05T12:58:38+5:30
केंद्रांवर उत्सवासारखे वातावरण ठेवा: निवडणूक आयोगाने केली पर्यवेक्षकांना सूचना

बिहार: पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता; १८ जिल्हे, १२१ जागांसाठी ६ नोव्हेंबरला मतदान
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता थांबला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ जागांसाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात शांततेत व नि:पक्ष मतदान व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे.
सर्व मतदान केंद्रांवर शांतता आणि उत्सवासारखे वातावरण असावे, ज्यामुळे मतदार आकर्षित होतील, असे निर्देश निवडणूक आयोगाने पर्यवेक्षकांना दिले आहेत. प्रत्येक बूथवर शंभर टक्के वेबकास्टिंग, नवीन मतदारांसाठी माहितीपत्र यांसारख्या उपाययोजना आयोगाने केल्या असून, प्रत्येक बुथवर १२१ साधारण, १८ पोलिस व ३३ इतर पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.
या टप्प्यातील २,१३५ मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ एक तास कमी करण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान होईल. ही मतदान केंद्रे संवेदनशील असून, मुख्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या केंद्रांसाठी ही व्यवस्था आहे.
- ३,७५,१३,३० - पहिल्या टप्प्यातील एकूण मतदार
- १,०८,३५,३२५ - पहिल्या टप्प्यातील एकूण पुरुष मतदार
- १,७६,७७,२१९ - पहिल्या टप्प्यातील महिला मतदार
- ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश
- ४५,३४१ मुख्य बूथ
वादग्रस्त विधानाबद्दल ललनसिंहांविरुद्ध गुन्हा
‘विरोधकांच्या घरोघरी जाऊन त्यांना बाहेर पडू देऊ नका’, असे वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री व जदयूचे नेते राजीव रंजन ऊर्फ ललनसिंह यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
बुलेटवरील तरुणीने वेधले लक्ष, म्हणाली योगी ‘हीरो’
योगी यांचा हा रोड शो सुरू असताना आस्था नामक एक तरुणी योगींच्या वाहनासमोर बुलेटवर स्वार होती. योगी हे आपले ‘हीरो’ असल्याचे सांगून महिलांनी धाडसाने पुढे यावे व राजकारणात सक्रिय व्हावे, हा संदेश देण्यासाठी बुलेटवर निघालो असल्याचे ती म्हणाली.
तेजस्वी यांच्याकडून आश्वासनांचा पाऊस
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार मंगळवारी समाप्त होण्यापूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे नेते व महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत अनेक मोठ्या योजनांची आश्वासने दिली. महाआघाडीचे सरकार सत्तेत आले तर जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ७० किमी अंतराच्या क्षेत्रातच केल्या जातील, शेतकऱ्यांना मोफत वीज, अशी आश्वासने तेजस्वी यांनी दिली. माई-बहन योजनेंतर्गत ३० हजार रुपये एकरकमी दिले जातील, असेही तेजस्वी म्हणाले.
नितीशकुमार यांचे चॅनेल दिल्लीतून बदलतात: राहुल
औरंगाबाद (बिहार) : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे चॅनेल दिल्लीतील नेते टीव्हीच्या रिमोटसारखे बदलत असतात. दिल्लीच्या दोन नेत्यांना हवे तेच नितीशकुमार करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे आयोजित सभेत केली. बिहार सरकारने राज्यातील युवकांना देशाचे मजूर केले. एकेकाळी चीन, जपान, इतर देशांतून शिक्षणासाठी विद्यार्थी बिहारमध्ये येत होते. आज याच युवकांना बिहारबाहेर रोजगार शोधावा लागत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. युवक रिल्सद्वारे पैसे कमावत असल्याचे भाजप नेते सांगतात, असे नमूद करून याचा लाभ बड्या उद्योगपतींनाच होत असल्याची टीका राहुल यांनी केली.
‘नितीशकुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप नाही’
वैशाली : एवढी वर्षे सत्तेत राहूनही नितीशकुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नसल्याचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी सांगितले. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीए सरकारने अभूतपूर्व कार्य केले असल्याचे त्यांनी वैशाली येथे आयोजित जाहीर सभेत नमूद केले.
दरभंगात योगी यांचा १० किलोमीटर रोड शो
दरभंगा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी बिहारच्या दरभंगामध्ये १० किमी रोड शो केला. योगी हाती माईक घेऊन ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते. तर, हजारोंच्या संख्येने जमलेले लोक ‘योगी-मोदी’ अशा घोषणा देत होते.
‘जंगल राज’ रोखण्यासाठी कमळाचे बटण दाबा : शाह
बिहारमध्ये ‘जंगल राज’ पुन्हा परतू नये असे वाटत असेल तर ते रोखण्यासाठी मतदान यंत्रावर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे बटण दाबा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथे प्रचारसभेत केले. ज्या जंगल राजने राज्याचे नुकसान केले ते परतू नये म्हणून जागरूक राहावे, असेही शाह या वेळी म्हणाले.