समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर बुलडोझर कारवाई, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:46 IST2024-12-20T15:42:26+5:302024-12-20T15:46:20+5:30
संभल हिंसाचाराप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर बुलडोझर कारवाई, कारण काय..?
UP Sambhal :उत्तर प्रदेशातील संभलम हिंसाचार आणि वीजचोरी प्रकरणात सहभागी असलेले समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्याविरोधात कारवाई तीव्र झाली आहे. त्यांनी केलेल्या अतिक्रमणावरही प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, महापालिकेच्या पथकाने भुर्के यांच्या घराबाहेरील नाल्यावर बांधलेल्या अवैध पायऱ्याही बुलडोझरच्या सहाय्याने तोडल्या आहेत.
खासदार बुर्केयांना 1.91 कोटींचा दंड
संभलमधील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यावरही वीज चोरीचा आरोप आहे. वीजचोरीप्रकरणी वीज विभागाने त्यांना 1 कोटी 91 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय वीज विभागाने त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. एवढेच नाही, तर सपा खासदार भुर्के यांच्या घराची वीजही खंडित करण्यात आली आहे.
वीज विभागाचे एसडीओ संतोष त्रिपाठी यांनी सांगितले की, वीज विभागाच्या पथकाने खासदार भुर्के यांच्या घरी बसवण्यात आलेल्या मीटरचे रीडिंग घेतले असता ते शून्य असल्याचे समोर आले. त्यानंतर विभागाकडून त्यांना नोटीस पाठवली गेली. नोटीस दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत रक्कम जमा न केल्यास विभागाकडून आरसी जारी केली जाईल.
खासदारांच्या वडिलांवर गुन्हा
वीज विभागाचे पथक छापा टाकण्यासाठी खासदार भुर्के यांच्या घरी पोहोचले असता, वीज कर्मचाऱ्यांना खासदाराचे वडील मामलुक उररहमान बुर्के यांनी धमकावले. आमचे सरकार आल्यावर पाहून घेऊ, असे त्यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. त्यांच्या वक्तव्याबाबत वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून नखासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभल हिंसाचारप्रकरणी खासदारावरही गुन्हा दाखल
24 नोव्हेंबर रोजी संभलमधील शाही जामा मशिदीत सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी एफआयआरमध्ये खासदार भुर्के यांचे नाव देखील समाविष्ट केले आहे. पोलिसांचा आरोप आहे की, बर्के यांनी भडकाऊ भाषणे दिली होती, ज्यामुळे हिंसाचार झाला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे दोन डझन लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अडीच हजारांहून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यातील बहुतांश लोक अज्ञात आहेत.