राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:47 IST2025-08-02T10:46:47+5:302025-08-02T10:47:55+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या ४ सदस्यांची नियुक्ती राज्यसभेत खासदार म्हणून केली आहे.

राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
नवी दिल्ली - राज्यसभेचे माजी सभापती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधीच भाजपाची राज्यसभेत ताकद वाढली आहे. एप्रिल २०२२ नंतर पहिल्यांदा राज्यसभेत भाजपाने १०० चा आकडा पार केला आहे. या सदस्यांमध्ये नुकतेच नवनिर्वाचित झालेले राष्ट्रपती नियुक्त ३ सदस्यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या ४ सदस्यांची नियुक्ती राज्यसभेत खासदार म्हणून केली आहे. ज्यात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर आणि राजकीय इतिहासकार मिनाक्षी जैन यांचा समावेश आहे. मागील महिन्यात शपथ घेणाऱ्या या ४ सदस्यांपैकी ३ सदस्य भाजपाचे आहेत. ज्यात उज्ज्वल निकम, हर्षवर्धन श्रृंगला आणि सी सदानंदन मास्टर हे भाजपाचे सदस्य आहेत. या ३ नव्या सदस्यांमुळे राज्यसभेत भाजपाची सदस्य संख्या १०२ इतकी झाली आहे.
३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा राज्यसभेत भाजपा खासदारांची संख्या १०० हून अधिक झाली आहे. याआधी ३१ मार्च २०२२ रोजी १३ राज्यसभा जागांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. त्यावेळी भाजपा खासदारांची संख्या ९७ वरून १०१ इतकी झाली होती. काँग्रेसला १९८८ आणि १९९० मध्ये हे यश गाठता आले होते जेव्हा त्यांची सदस्य संख्या १०० पेक्षा अधिक झाली होती.
राज्यसभेचं संख्याबळ किती?
राज्यसभेत सध्या २४० खासदार आहेत. ज्यात १२ सदस्य नामनिर्देशित आहेत. ५ जागा अद्याप खाली आहेत. सध्याच्या सभागृहात भाजपा खासदारांची संख्या १३४ इतकी आहे. ज्यात १२ नामनिर्देशित खासदारांपैकी ५ जणांचा समावेश आहे. एकट्या भाजपाकडे १०२ खासदार आहेत. या सभागृहात बहुमतासाठी १२१ खासदारांपेक्षा जास्त सदस्य भाजपा सरकारकडे आहेत.
कोण आहेत ३ नवनियुक्त खासदार?
प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे एक विशेष सरकारी वकील आहेत. त्यांनी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहचवण्याचं काम केले. त्याशिवाय असे अनेक खटले त्यांनी लढले आहेत. २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. २०२४ ची लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लढली होती.
हर्षवर्धन श्रृगंला २०२० ते २०२२ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते. २०२३ च्या जी २० शिखर संमेलनात त्यांनी मुख्य समन्वयक म्हणून काम केले. अमेरिकेत भारताचे राजदूत आणि बांगलादेशात उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम सांभाळले होते.
सी सदानंदन मास्टर हे केरळमधील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक आहेत. १९९४ मध्ये त्यांचे पाय कापण्यात आले होते आणि ते भाजपामध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्यावर संतापलेल्या सीपीएम कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता असा आरोप त्यांनी केला होता.