लोकांचा आवाज दाबला जातोय; सत्तेचे केंद्रीकरण..; राहुल गांधींचा BJP–RSS वर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:51 IST2026-01-19T17:51:19+5:302026-01-19T17:51:36+5:30
'सरकार लोकांचा आवाज दाबून काही मोजक्या कॉर्पोरेट घराण्यांना फायदा करून देत आहे.'

लोकांचा आवाज दाबला जातोय; सत्तेचे केंद्रीकरण..; राहुल गांधींचा BJP–RSS वर आरोप
Rahul Gandhi Slams BJP-RSS: केरळमधील कोच्ची येथे आयोजित काँग्रेसच्या महापंचायतीत राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, BJP आणि RSS सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काँग्रेस पक्षाचा मूलभूत विचार सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आधारित आहे.
लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
राहुल गांधी यांनी आरोप केला की, भाजपच्याच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबून काही मोजक्या कॉर्पोरेट घराण्यांना फायदा करून देत आहे. भाजपला देशातील लोकांनी शांत राहावे असे वाटते आणि केवळ निवडक कॉर्पोरेट घराण्यांनी प्रगती करावीत, अशी त्यांची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व अधोरेखित
महापंचायतीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि UDF (युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) ला मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका, सर्व स्तरांवर काँग्रेसने उत्तम कामगिरी केली आहे. पंचायती हा लोकशाहीचा तिसरा आणि सर्वात मजबूत पाया आहे. संविधानाचे संरक्षण करायचे असेल, तर पंचायती आणि नगरपालिकांचे संरक्षण करावे लागेल.
LIVE: Shri @RahulGandhi addresses the Maha Panchayat of elected local body representatives | Kochi, Kerala https://t.co/kxxI2trUgA
— Congress (@INCIndia) January 19, 2026
73वा आणि 74वा घटनादुरुस्तीचा उल्लेख
राहुल गांधी यांनी आठवण करून दिली की, 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती काँग्रेस पक्षानेच आणली, ज्यामागे एक व्यक्ती, एक मत आणि प्रत्येक भारतीयाला देशाच्या कारभारात आवाज मिळावा, ही भूमिका होती. मी पूर्ण खात्रीने सांगतो, केरळच्या लोकांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केरळचे लोक आपला आवाज ठामपणे व्यक्त करतील.
नेतृत्व लोकांशी जोडलेले असावे
राहुल गांधी म्हणाले की, कोणतेही सरकार यशस्वी व्हायचे असेल, तर नेतृत्व लोकांपर्यंत सहज पोहोचणारे आणि नम्र असावे. नेतृत्व लोकांमध्ये मिसळले पाहिजे. केरळच्या लोकांच्या आवाजाचे खरे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व UDF आणि काँग्रेस देईल, याची मला खात्री आहे. दरम्यान, ही महापंचायत केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी कडून आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात 15,000 पेक्षा जास्त निर्वाचित काँग्रेस प्रतिनिधी सहभागी झाले होते.