शाळेच्या पहिल्याच दिवशी ४ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, लचके तोडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:46 IST2026-02-25T18:46:24+5:302026-02-25T18:46:55+5:30
राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी ४ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, लचके तोडले अन्...
राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी एका ४ वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. कुत्र्यांनी या चिमुकल्याचे लचके तोडून त्याला जखमी केलं. यामध्ये मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बीकानेरच्या श्रीडूंगरगड भागातील ऊपनी गावात ही घटना घडली. स्वामी विवेकानंद मॉडेल स्कूलमध्ये रामप्रताप यांचा मुलगा रामू मुलगा पहिल्यांदाच आपल्या मोठ्या भावासोबत शाळेत गेला होता. सकाळी १०.३० च्या सुमारास, शाळेत दीड तास बसल्यानंतर तो वर्गाबाहेर आला. शाळेचा मुख्य दरवाजा उघडा असल्याने काही भटक्या कुत्र्यांनी आत शिरून त्याच्यावर हल्ला केला.
शाळेबाहेरून जाणाऱ्या एका ग्रामस्थाने हे पाहिले आणि कुत्र्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला पाहून शाळेत एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पालकांनी धावत शाळा गाठली आणि त्याला तात्काळ पीबीएम रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातील ट्रामा इंचार्ज डॉ. एल.के. कपिल यांनी सांगितलं की, कुत्र्यांनी हल्ला केल्याने डोक्याची त्वचा पूर्णपणे निघाली आहे. मुलाची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. मुलगा उपचारांना कसा प्रतिसाद देतो, यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असेल.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रामू वर्गातील शिक्षिकेच्या मागेमागे बाहेर आला, पण शिक्षिकेने त्याकडे लक्ष दिलं नाही. मुलगा एकटाच गेटपर्यंत पोहोचला आणि तिथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याला घेरलं. ग्रामस्थांनी शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळा प्रशासनाने आपली चूक मान्य केली असून भविष्यात काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे.