नितीश कुमार यांच्यानंतर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? 'हे' 4 नाव चर्चेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:20 IST2026-03-05T15:18:16+5:302026-03-05T15:20:39+5:30
Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नितीश कुमार यांच्यानंतर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? 'हे' 4 नाव चर्चेत...
Bihar Politics: बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच, आता बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. विशेष म्हणजे, राज्याचा नवा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असेल. या पार्श्वभूमीवर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण?
भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सम्राट चौधरी, नित्यानंद राय, दिलीप जयसवाल आणि संजीय चौरसिया यांची नावे चर्चेत आहेत.
सम्राट चौधरी आघाडीवर?
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहे. ते ओबीसीमधील कुशवाहा समाजातून येतात आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी पक्ष संघटना आणि सरकार दोन्ही पातळ्यांवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करत प्रशासकीय अनुभवही मिळवला आहे.
नित्यानंद राय यांचेही नाव चर्चेत
मुख्यमंत्री पदासाठी दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय. ते यादव समाजातून येतात आणि गेली अनेक वर्षे केंद्रात काम करत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर भाजपाने यादव मतदारांना आपल्याकडे ओढण्याची रणनीती आखली, तर नित्यानंद राय यांना मुख्यमंत्री बनवणे हा एक मोठा राजकीय संदेश ठरू शकतो.
दिलीप जायसवालही पर्याय
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे मंत्री दिलीप जयसवाल यांचे नावही चर्चेत आहे. ते ईबीसी वैश्य (कलवार) समाजातून येतात आणि सीमांचल भागात त्यांचा मजबूत राजकीय प्रभाव मानला जातो. पक्ष नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जाते.
संजीव चौरसिया देखील शर्यतीत
पाटणा येथील दीघा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार असलेले संजीव चौरसिया यांचे नावही संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आहे. ते तमोली समाजातून येतात आणि पाटणा परिसरात मजबूत संघटनात्मक पकड असलेले नेते म्हणून ओळखले जातात.
बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री?
नितीश कुमार यांच्या राज्यसभा प्रवेशानंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पक्ष कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवतो आणि उपमुख्यमंत्री पद कोणाला दिले जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.