पैशांनी भरलेली थाळी बघून नवरदेवाला घाम फुटला, नवरीनं लग्नाला नकार दिला अन्...! गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बनवलं बंधक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:21 IST2025-05-30T15:20:56+5:302025-05-30T15:21:38+5:30
यासंदर्भात माहिती देताना संबंधित पोलीसठाण्याचे प्रमुख विनीत कुमार म्हणाले, ‘वऱ्हाडाला बंधक बनवून ठेवल्याची माहिती मिळताच आपण घटनास्थळी दाखल झालो. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला. कुठल्याही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही.

पैशांनी भरलेली थाळी बघून नवरदेवाला घाम फुटला, नवरीनं लग्नाला नकार दिला अन्...! गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बनवलं बंधक
बिहारमधील मोतिहारी येथील पतहा पोलिसठाण्याच्या हद्दीतील एका गावात "जयमाला" समारंभानंतर नवरी मुलीने लग्नास नकार दिला. यामुळे, दोन्ही बाजूंत वाद निर्माण झाला. यानंतर, गावकऱ्यांनी वर आणि त्याच्या कुटुंबाला बंदी बनवले. यासंदर्भात माहिती मिळताच पताही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण मोतिहारीच्या भुराखल गावचे आहे. लग्नाचे वऱ्हाड घोडासहनच्या कदमवा गावातून आले होते. मात्र, वर अशिक्षित असल्याने, संबंधित नवरी मुलीने लग्नास नकार दिला.
संबंधित नवरदेवाचे नाव लवकुश कुमार असे होते. तो अत्यंत आनंदात लग्नासाठी पोहोचला होता. यावेळी वऱ्हाडींनी जोरदार डान्स केला. वऱ्हाड आल्यानंतर मुलीकडच्यांनी नवरदेवाचे पूजन केले. यानंतर "जयमाला" कार्यक्रमानंतर, वऱ्हाडींनी नाश्ता केला. दरम्यान वधू पक्षाकडून एका मुलाने नवरदेवाच्या प्लेटमध्ये नोटा टाकल्या आणि नवरेवाला मोजण्यास सांगितले. मात्र, त्याला ते मोजता आले नाही. यानंतर मुलीने ताबडतोब त्याच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. परिणामी वऱ्हाड नवरी शिवाय रिकाम्या हातानेच आले तसे परतले.
मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर वर पक्षाच्या मंडळींनी त्यांच्यावर जबरदस्तीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर, वर बदलल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बंदी बनवले. गावात पंचायत झाली. मुलीलाही वारंवार समजावण्यात आले. मात्र, ती लग्नास तयार झाली नाही. यासंदर्भात बोलताना, आपली फसवणूक झाली आहे. वर बदलण्यात आला आहे. ज्या वरासोबत लग्न ठरले होते, तो वऱ्हाड घेऊन आला नाही, असे मुलीकडच्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात माहिती देताना संबंधित पोलीसठाण्याचे प्रमुख विनीत कुमार म्हणाले, ‘वऱ्हाडाला बंधक बनवून ठेवल्याची माहिती मिळताच आपण घटनास्थळी दाखल झालो. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला. कुठल्याही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही.