अयोध्येत रेल्वे अपघात घडवून आणण्याचं षडयंत्र उघड; रातोरात रुळाचे सहा बोल्ट केले गायब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:10 IST2022-01-24T16:09:07+5:302022-01-24T16:10:54+5:30
विधानसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री रामाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत मोठं षडयंत्र अखेर उघडकीस आलं आहे.

अयोध्येत रेल्वे अपघात घडवून आणण्याचं षडयंत्र उघड; रातोरात रुळाचे सहा बोल्ट केले गायब!
विधानसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री रामाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत मोठं षडयंत्र अखेर उघडकीस आलं आहे. रेल्वे रुळाचे तीन हूक आणि तीन नटबोल्ट रातोरात गायब केले गेल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रेल्वे रुळांना एकसंध ठेवण्याचं काम करणारे बोल्ट गायब करण्यामागे रेल्वे अपघाताचं मोठं षडयंत्र उघडकीस आलं आहे. त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
मोठा अपघात टळला
जालपा नाला परिसरात रेल्वेरुळ क्रमांक २९७ ला ट्रॅक जोडण्यासाठी लावण्यात आलेले तीन हूक बोल्ट आणि तीन आऊटर बोल्ट गायब झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उढाली. रविवारी सकाळी जेव्हा एका रेल्वे कर्मचाऱ्याची यावर नजर पडली तोवर तीन प्रमुख रेल्वे गाड्या याच रेल्वेरुळावरुन गेल्या होत्या. सुदैवानं यात कोणतीही दुर्घटना झाली नाही.
प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात
रेल्वे रुळाचे नट बोल्ट गायब होण्याच्या घटनेचे पडसाद रेल्वे विभागात उमटले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे आणि संपूर्ण घटनेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. लखनऊ डीआरएमच्या नेतृत्त्वाखाली याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ रेल्वे रुळ दुरूस्त करण्यात आले होते.