"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:55 IST2025-05-17T16:51:05+5:302025-05-17T16:55:25+5:30
Asaduddin Owaisi on Pakistan and terrorism: भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच उद्दिष्ट्य असेही ते म्हणाले

"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
Asaduddin Owaisi on Pakistan and terrorism: AIMIM चे प्रमुख हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. "पाकिस्तान हा दहशतवादाचा प्रायोजक आहे. पाकिस्तानने आतापर्यंतच्या सर्व घटनांतून सिद्ध केले आहे की पाकिस्तान हा देश मानवतेसाठी धोका बनला आहे. भारताला आता आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवून द्यावे लागेल की गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी जात आहेत आणि हे खपवून घेतले जाणार नाही," असे ओवेसी शनिवारी एका मुलाखतीत म्हणाले.
"मुहम्मद झिया-उल-हक यांच्या काळापासून ते कंधार विमान अपहरण, २६/११ मुंबई हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट, रियासी आणि अलिकडे पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येपर्यंत पाकिस्तानची भूमिका स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा (डीप स्टेट) आणि ISIS भारतात अस्थिरता पसरवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्लेखोर पाठवणे हे याचे पहिले उदाहरण होते. तेव्हापासून ते हेच करत आहेत आणि भविष्यातही तेच करत राहतील," असे ताशेरे ओवेसींनी पाकिस्तानवर ओढले.
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशाबाबत...
केंद्र सरकारच्या सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात असदुद्दीन ओवेसी यांना एका शिष्टमंडळाचा सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. जागतिक व्यासपीठावर भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट असणार आहे. याबाबत ओवेसी म्हणाले, "हे कोणत्याही पक्षाबद्दल नाही तर भारताबद्दल आहे. मी ही जबाबदारी गांभीर्याने घेईन. निघण्यापूर्वी एक सविस्तर बैठक घेतली जाईल. मी माझ्या देशासाठी योग्य तेच करेन. तसेच पाकिस्तान स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून जगासमोर सादर करत आहे हे योग्य नाही. भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम राहतात. पाकिस्तानचा हा दावा मूर्खपणाचा आहे. हे जगाला सांगणे देखील महत्त्वाचे आहे.
मंत्री विजय शाह यांच्याबद्दल...
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, कर्नल सोफिया ही देशाची कन्या आहे आणि ती आपल्या सशस्त्र दलांचा एक भाग आहे. मंत्र्यांचे वक्तव्य धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने आहे. भाजपने त्यांना बडतर्फ करावे आणि तुरुंगात पाठवावे. यामुळे जगाला संदेश जाईल की भारत कोणत्याही प्रकारचा जातीय द्वेष सहन करत नाही.