Arvind Kejriwal : "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:55 IST2026-03-23T17:54:36+5:302026-03-23T17:55:28+5:30
Arvind Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Arvind Kejriwal : "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मध्य पूर्वेतील संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या विधानावर केजरीवाल यांनी जोरदार पलटवार केला. "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं? या सरकारच्या अपयशाची किंमत सामान्य माणसालाच का मोजावी लागते?" असा सवाल देखील विचारला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. "मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेलं संकट हाताळण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. शेअर बाजार कोसळत आहे, एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत, लोक कडाक्याच्या उन्हात सिलिंडरसाठी रांगा लावत आहेत, स्थलांतरित कामगारांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं गेलं आहे आणि रुपयाने नीचांकी पातळी गाठली आहे."
The Modi government has completely failed to handle the crisis triggered by the war in the Middle East. The stock market is crashing, LPG shortages have forced many businesses to shut down, people are queuing for cylinders in scorching heat, migrant workers have been left without…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 23, 2026
"युद्ध कधीही सुरू होऊ शकतं हे संपूर्ण जगाला माहित होतं. मग मोदी सरकारची कोणतीही तयारी का नव्हती? आधीच पुरेशी व्यवस्था का केली गेली नाही आणि पर्यायी पुरवठा का सुनिश्चित केला गेला नाही? प्रत्येक संकटाचं ओझं अखेर जनतेवरच का लादलं जातं? या सरकारच्या अपयशाची किंमत सामान्य माणसालाच का मोजावी लागते?" असं म्हणत केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
पंतप्रधानांनी सरकार या संकटांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्लॅन बीही सांगितला. मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. कच्चे तेल, आवश्यक गॅसचा बहुतांश पुरवठा याच मार्गाने येतो. परंतु युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझमधून टँकर आणणं आव्हानात्मक बनलं आहे.
भारतात क्रूड, गॅसपासून खतांची आयातही याच देशातून होते. LPG ची ६० टक्के आयातही केली जाते. व्यावसायिक जहाजांवर हल्ला आणि होर्मुझमधील अडथळा मंजूर नाही. सरकार या मार्गावरून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिथल्या प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सरकार पूर्णत: सतर्क मोडला आहे असंही त्यांनी सांगितलं.