रात्रभर बाइक सुरू ठेवली, घरात विषारी वायू भरला; पती-पत्नीसह दोन मुलांचा झोपेतच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:22 IST2026-03-15T13:20:41+5:302026-03-15T13:22:52+5:30
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

रात्रभर बाइक सुरू ठेवली, घरात विषारी वायू भरला; पती-पत्नीसह दोन मुलांचा झोपेतच मृत्यू
Andhra Pradesh :आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. बाइक रात्रभर सुरू ठेवल्याने त्यातून बाहेर पडलेल्या कार्बन मोनोऑक्साइड, या विषारी वायूमुळे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पुंगनूरमधील त्यागराजू स्ट्रीट परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या बाइकचे इंजिन दुरुस्त करून घेतले होते. दुरुस्तीनंतर इंजिनचे नवे पार्ट व्यवस्थित बसण्यासाठी बाइक काही वेळ सतत चालू ठेवण्याचा सल्ला मेकॅनिकने दिला होता. यामुळेच संबंधित व्यक्तीने बाइक घरातच उभी ठेवून तिचे इंजिन सुरू केले. रात्री थंडी जास्त असल्याने घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करण्यात आल्या. मात्र बंद घरात सुरू असलेल्या बाइकच्या इंजिनातून निघणारा धूर आणि विषारी वायू हळूहळू खोलीत साचू लागला.
कार्बन मोनोऑक्साइडमुळे गुदमरून मृत्यू
तज्ज्ञांच्या मते, बाइकच्या इंजिनातून बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साइड हा वायू रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असतो. त्यामुळे तो सहज लक्षात येत नाही. हा वायू शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो. त्याच्या संपर्कात आल्यास माणूस बेशुद्ध पडू शकतो आणि काही वेळातच मृत्यू होऊ शकतो. या घटनेतही नेमके तेच घडले. रात्री झोपल्यानंतर पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले पुन्हा जागी झालीच नाहीत. विषारी वायूमुळे झोपेतच चौघांचा गुदमरून मृत्यू झाला.
सकाळी घर न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय
सकाळी बराच वेळ झाला तरी घराचे दार उघडले नाही आणि घरातून कोणतीही हालचाल दिसली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. अनेक वेळा दार ठोठावूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती पाहून त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात चारही जण बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले आणि संपूर्ण घरात दमघोंटू वातावरण होते. तत्काळ वैद्यकीय पथकाला बोलावण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले.
नागरिकांसाठी गंभीर इशारा
या घटनेमुळे पुंगनूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन लहान मुलांसह कुटुंबातील चार जणांचा झालेला मृत्यू संपूर्ण भागाला हादरवून गेला आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, वाहनांचे इंजिन, जनरेटर किंवा इंधनावर चालणाऱ्या यंत्रणा बंद जागेत चालू ठेवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा लहानशा निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडू शकते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.