अपघातानंतर बस पेटली, चालकासह तिघांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:36 IST2026-01-22T12:35:53+5:302026-01-22T12:36:47+5:30
Andhra Pradesh Accident: मागील तीन महिन्यांतील दुसरी घटना; यापूर्वी झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू!

अपघातानंतर बस पेटली, चालकासह तिघांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी...
Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. बस आणि कंटेनर लॉरी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात कसा झाला?
ही घटना मंगळवारी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास . नेल्लोरहून हैदराबादकडे जाणाऱ्या खासगी बसचा अचानक टायर फुटला. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस आधी डिव्हायडरवर आदळली, त्यानंतर समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला जोरात धडकली.
धडकेनंतर बसला आग
कंटेनर ट्रकमध्ये बाइकची वाहतूक केली जात होती. भीषण धडकेनंतर बस आणि ट्रक दोन्ही वाहनांना आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बसच्या काचा फोडण्यात आल्या. अनेक प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारत आपले प्राण वाचवले.
VIDEO | Nandyal, Andhra Pradesh: Two dead, 14 injured in bus-lorry collision; injured shifted to hospital.#AndhraNews#AndhraPradesh
— Press Trust of India (@PTI_News) January 22, 2026
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/AHXX8G8q3p
ड्रायव्हरसह ३ जणांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत बस आणि कंटेनर लॉरी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. या अपघातात बस चालक, ट्रक चालक आणि एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर
अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. यापैकी चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नंदयाल जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात टायर फुटल्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तीन महिन्यांत दुसरी घटना
विशेष म्हणजे, बसला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये आंध्र प्रदेशातील कुरनूल येथेही बसला आग लागून २० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अवघ्या तीन महिन्यांत आग लागण्याची दुसरी घटना घडल्याने राज्यातील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.