नवी दिल्ली: जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुख म्हणून (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगतिले. तसेच आम्ही राजकारणापासून नेहमी दूर असतो. आम्ही सरकारने दिलेल्या आदेशानुसार काम करतो असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे.
बिपीन रावत यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर भाष्य करत जे लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातात, ते नेते नसतात असं म्हटलं होतं. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी राजकीय नेत्यांनी काय करायला हवे हे सांगण्याचे लष्कराचे काम नसल्याचे सांगत बिपीन रावत यांच्या विधानावर टीका केली होती. पी. चिदंबरम यांच्या टीकेवर सीडीएस बिपीन रावत यांनी आम्ही राजकारणापासून नेहमी दूर असतो असं सांगितलं आहे. बिपीन रावत यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'चा (सीडीएस) पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करेल.
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी म्हणाले होते. ''चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम असेल. सध्या जग वेगानं बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल,''असा विश्वास मोदींनी त्यावेळी व्यक्त केला होता.